• Mon. Jun 15th, 2026
    …तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही; राजू शेट्टींचं महत्त्वाचं वक्तव्य

    कोल्हापूर: ‘आमदार प्रकाश आवाडे यांची देशाचे सहकारमंत्री; तसेच राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी सलगी आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता आणि चालू वर्षी गळीत हंगामातील पहिली उचल ३५०० रुपये दिल्यास मी २०२४ची लोकसभा निवडणूक लढविणार नाही,’ असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथील ठिय्या आंदोलनस्थळी सांगितले.

    निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून शेट्टी चळवळीच्या माध्यमातून राजकारण करीत असल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला होता. या आरोपाला शेट्टी यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे, हे मी नाकारणार नाही. मात्र, आमदार आवाडे भीती दाखवितात अशी परिस्थिती नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षी असणारा पाणीसाठा व आजच्या दिवशी असणारा पाणीसाठा याची परिस्थिती पाहिल्यास जर व्यवस्थित व काटकसरीने पाणी सोडण्याचे नियोजन केले, तर मे अखेरपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो. मात्र, राज्यकर्ते सरकारमध्ये असलेला आपला अधिकार वापरून शेतकऱ्यांचा काटा काढायचा या सूडापोटी धरणात पाणीसाठा असतानाही धरणातून पाणी न सोडणे, कृषी पंपांचा वीजपुरवठा खंडित करणे यासारखे प्रकार करू लागले आहेत.’

    ‘मी चळवळीसाठी जगणारा व राजकारण करणारा माणूस आहे. मला राज्यातील शेतकरी सुखी झालेले पाहायचे आहे. तुमचे मात्र तसे नसून, तुमची दुकानदारी चालविण्यासाठी तुम्ही राजकारण करता,’ असा टोला शेट्टी यांनी आवाडे यांना लगावला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed