• Tue. Jun 16th, 2026
    जूनच्या पंधरवड्यात राज्यात पावसाची ६९ टक्के तूट, संथ गतीने मान्सूनची प्रगती सुरू; कुठे-कधी सक्रिय होणार?

    Monsoon Tracker: जूनच्या पंधरवड्यात राज्यात पावसाने ओढ दिली असल्यामुळे नागरिक, शेतकरी हैराण झाले आहेत. मान्सूनची प्रगती संथ गतीने सुरु झाली असून येत्या काही दिवसांत संपूर्ण राज्यात सक्रिय होण्याची आशा आहे.

    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यात जूनचा पंधरवडा पूर्ण झाला, तरी अद्याप पावसाने ओढ दिल्याने चिंतेचे ढग दाटले आहेत. शेतीकामापासून पाण्यापर्यंत अनेक प्रश्नांच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. यातच जूनच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात ६९ टक्के पावसाची तूट नोंदली गेली. यानंतरही पुढचे काही दिवस मान्सूनचे मार्गक्रमण संथ गतीनेच राहण्याचा अंदाज असून राज्यात १८ जूननंतर मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू होईल, अशी शक्यता हवामान विभागाने रविवारी वर्तवली.

    भारतीय हवामान विभागाने रविवारी मान्सूनचा अद्ययावत अंदाज जारी केला. यानुसार महाराष्ट्रातील मान्सूनचा प्रवास येत्या चार ते पाच दिवसांमध्ये पुन्हा पुढे सुरू होऊ शकतो. १८ ते २५ जून या कालावधीत पावसाचा जोर कोकण किनारपट्टीवर थोडा वाढू शकेल. २५ जून ते २ जुलै या कालावधीत मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन आठवड्यांमध्ये मान्सून कोकणासह राज्याच्या बहुतांश ठिकाणी दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला. राज्यात हर्णे आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचल्यानंतर वायव्येकडील वाऱ्यांनी, तसेच मध्य भारतावर निर्माण झालेल्या प्रत्यावर्ती चक्रीयवात स्थितीमुळे मान्सूनचा प्रवास रखडला आहे.

    ठाण्यात १०० टक्के तूट

    ठाणे, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये पावसाची १०० टक्के तूट आहे. ठाणे जिल्ह्यात १ ते १४ जून या कालावधीत नेहमी सरासरी १०९.२ मिमी. पाऊस पडतो. पण या दोन्ही आठवड्यांत मुंबई १५९.१ आणि उपनगरात १५५.६ मिलीमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा केवळ एक दिवस पाऊस पडला आहे. राज्यात केवळ सिंधुदुर्गात पावसाने १०० मिमीचा टप्पा ओलांडला असून सिंधुदुर्गमध्ये १०७.५ मिमी., रत्नागिरीत ७७.५ मिमी. पाऊस पडला.

    नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट

    हवामान विभागाने मंगळवारी (दि. १६) जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. उष्ण आणि दमट हवामानामुळे दुपारपासून हलक्या सरींची किंवा ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रविवारी (दि. १४) आणि मंगळवारी दुपारनंतर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

    मराठवाड्यात सोमवारी हवामान कसं असेल?

    मराठवाड्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. दिवसभर ताशी ४०-५० किमी वेगाने वाहणारे वारे असेल आणि याची गती ताशी ६० किमीपर्यंत जाऊ शकते. सध्या मराठवाड्यात उष्णतेची लाट आली असून १६ ते १८ जूनदरम्या विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    विदर्भात मान्सूनआगमन कधी?

    मान्सून कोकण किनारपट्टीवर दाखल झाला असला तरी विर्दभापर्यंत मान्सूनचा प्रवास अतिशय संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे विदर्भात उष्णतेच्या लाटा येत असून सोमवारीही वातावरण दमट राहण्याची शक्यता आहे. मान्सूनसाठी १८ ते २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

    खानदेशमध्ये हवामान कसं असेल?

    खानदेशात सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. या भागांत मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी पूर्वमान्सूनच्या हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

    Maharashtra TimesMumbai Heat: मुंबईत रात्रीही पारा उतरेना, डोळे लागलेत आभाळाकडे; अचानक उकाडा वाढण्यामागचं कारण काय?

    पश्चिम महाराष्ट्रातील हवामान

    राज्यात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये सोमवारी मान्सूनपूर्व पाऊस होण्याची शक्यता आहे. पुणे आणा सातऱ्यामधील घाट प्रदेशात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा