• Mon. Jun 15th, 2026

    ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मंत्री उदय सामंत यांचा मोठा दिलासा

    ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’, जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना मंत्री उदय सामंत यांचा मोठा दिलासा

    Uday Samant Marathi News : रत्नागिरीत अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या अधिवेशनात पालकमंत्री उदय सामंत यांनी शिक्षकांना दिलासा दिला. शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले. अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी असलेल्या विस्तार अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. शिक्षकांच्या राज्यस्तरीय मागण्यांसाठी मंत्री दादा भुसे यांच्यासोबत बैठक आयोजित केली जाईल, असे आश्वासन सामंत यांनी दिले. जिल्हा स्तरावरील प्रश्नही लवकरच मार्गी लागतील.

    (फोटो– Lipi)

    प्रसाद रानडे, रत्नागिरी : प्राथमिक शिक्षक असू दे व माध्यमिक शिक्षक असू दे हे खऱ्या अर्थाने देशाच्या शिक्षणाचा पाया रचतात आणि तो पाया रचल्यानंतरच आम्ही त्यावर कळस चढवतो. प्राथमिक शिक्षकांनी जर का माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शिकवलं नसतं तर राज्यातील मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री मी होऊ शकलो नसतो. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलो आणि हे सांगायला मला कधीच लाज वाटत नाही अशा शब्दात शिक्षकांच्या कामाच कौतुक पालकमंत्री उदय सामंत यांनी केल. यावेळी काही मागणी प्राथमिक शिक्षण संघटनेकडून करण्यात आल्या होत्या यातील तीन मागण्यासंदर्भात सामंत यांनी सांगितले की, आपलं कामच असं असतं की ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’ त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही असं सांगत प्राथमिक शिक्षकांना दिलासा देत प्राथमिक जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून तीन महत्त्वाच्या मागण्या मान्य करून घेतल्याचे त्यांनी सांगितले. तुमच्या या तीन मागण्या मार्गी लावल्या आहेत.

    अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, रत्नागिरी जिल्हा संघटनेच्या जिल्हास्तरीय अधिवेशन कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना दिलासा दिला आहे. शिक्षकांनीही सामंत यांच्या या भूमिकेच टाळ्या वाजवून स्वागत केले. पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना दोन मे पासूनच सुट्टी मिळाल्यास पालक विद्यार्थी व शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

    ते पुढे म्हणाले की, शिक्षकांच्या अडचणी सोडवणे ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी स्वीकारत असताना तिकडे तुमच्या संघटनेचे पदाधिकारी देवळेकर सर भाषण करत असताना मी तुमचे तीन प्रश्न सोडवले. आपली सिस्टमच अशी आहे आपलं कामच असं असतं की ‘एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल’ त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही तुमची सात तारखेला बंद होणारी शाळा दोन तारखेलाच बंद होईल त्यानंतर अनुदानासंदर्भात तुमचा काही प्रश्न होता त्या संदर्भातही सांगितलं आमचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कासार साहेब काही आढेवेढे घेत होते त्यांना मी सांगितलं भविष्यात मी जर का आढेवेढे घेतले तर शिक्षणाधिकारी अडचणीत येतील त्यामुळे तोही विषय मान्य झाला आहे. आताच निर्देश दिलेले आहेत की ज्या विस्तारअधिकाऱ्यांकडे सात- सात आठ आठ वर्ष चार्ज आहेत त्याची यादी माझ्याकडे आली पाहिजे पुढच्या आठवड्यात ज्यांना तीन वर्षे पूर्ण झाली आहेत ते सगळे विस्ताराधिकारी बदलून त्या ठिकाणी नवीन चार्ज दिले जातील. पण चार्ज दिल्यानंतर परत माझ्याकडे येऊ नका की हा चांगला आहे आणि हा वाईट आहे. राजकारण्यांच्यामध्ये जशी खोड असते तशी तुमच्यातही काही खोड कमी नाही, असं हसत हसत मिश्किलपणे सामंत बोलले

    बाकीच्या संघटनांनीही मान्य केलं पाहिजे की जो अधिकारी एका खुर्चीवरती दहा दहा वर्षे बसतो गटशिक्षणाधिकारी म्हणुन बसतो आणि त्याला असं वाटतं की मी जिल्हा परिषदेचा सीईओच झालेलो आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन काही नियम ते तयार करतात असे शब्दात काही अधिकाऱ्यांना त्यांनी सुनावल आहे. पण याच्यामध्ये काही लोक भरडली जाणार आहेत हे देखील लक्षात घ्या जे अतिशय प्रामाणिकपणाने तुमच्याशी समरस होऊन काम करत आहेत तुम्हाला ताकद देण्याचे काम करत आहेत त्यांच्यावरदेखील गंडांतर येणार आहे त्यामुळे आपण एक यादी तयार करू नंतरच त्यामध्ये फेरबदल करू असाही काहीसा दिलासा सामंत यांनी दिला.

    बदली करणे, चार्ज काढून घेणे हे फार सोपं आहे मात्र ते केल्यानंतर आगीतून उठून फोफाट्यात पडलो असं व्हायला नको म्हणून आपण काहीतरी चर्चा करून निर्णय घेऊ असा मध्यममार्ग उदय सामंत यांनी शिक्षण विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत सामंत यांनी सांगितला. तुमच्या राज्यस्तरावरील काही मागण्या आहेत संचमान्यता, जुनी पेन्शन, शिक्षण सेवक पद कायम करणे आणि काही मागण्या या संदर्भातला विषय आहे यासाठी लवकरच मंत्री दादा भुसे यांच्याकडे बैठक आयोजित करून तुम्हाला न्याय देण्याचं काम करू अशी ग्वाही त्यांनी दिली. जिल्हास्तरावरील प्रश्नसंदर्भातही आपण लवकरच बैठक घेऊ अशीही ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *