• Sun. Aug 2nd, 2026

    आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Aug 2, 2026
    आषाढी यात्रेत ‘लालपरी’ ठरली लाखो भाविकांची विश्वासाची सोबती! – महासंवाद

    मुंबई, दि. २ ऑगस्ट : ‘पंढरीची वारी’ ही महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेचा आत्मा आहे. विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरकडे निघालेल्या लाखो भाविकांच्या प्रवासात यंदाही महाराष्ट्राची ‘लालपरी’ विश्वासाची सोबती ठरली. आषाढी यात्रेनिमित्त एसटी महामंडळाने सुमारे ५,५०० बसेसच्या माध्यमातून ९ लाखांहून अधिक भाविक-प्रवाशांना सुखरूप आणि सुरक्षित प्रवास घडविला. लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य एसटी परिवाराला लाभले, ही आमच्यासाठी विठुरायाची कृपाच असल्याची भावनिक प्रतिक्रिया परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली.

    आषाढी यात्रेसाठी एसटी महामंडळाने राज्याच्या विविध भागांतून पंढरपूरसाठी विशेष वाहतुकीचे नियोजन केले होते. यात्रेच्या कालावधीत एसटीने २१ हजार ५२७ फेऱ्यांद्वारे ९ लाख २४ हजार ७३८ भाविक-प्रवाशांनी प्रवास केला असून, विशेष म्हणजे यात्रेच्या वाहतुकीतून एसटी महामंडळाला ४१ कोटी १८ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळाले. गतवर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात सुमारे ५ कोटी ३० लाख रुपयांची वाढ झाली आहे.

    याबाबत सरनाईक म्हणाले, “गळ्यात तुळशीची माळ, मुखी विठ्ठलाचे नाम आणि मनात पांडुरंगाच्या भेटीची ओढ घेऊन लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघतात. त्यांच्या या भक्तिमय प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याचे भाग्य आपल्या लालपरीला दरवर्षी लाभते. एखाद्या भाविकाला विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला सुखरूप पोहोचवणे आणि दर्शनानंतर त्याला सुरक्षितपणे आपल्या कुटुंबापर्यंत पोहोचवणे, ही केवळ प्रवासी वाहतूक नाही; ती एसटीच्या माध्यमातून घडणारी विठ्ठलसेवाच आहे.”

    “प्रवासी देवो भवः”

    राज्यातील विविध विभागांतून आलेल्या बसेस, चालक-वाहक तसेच यांत्रिक, सुरक्षा आणि प्रशासकीय विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या यात्रेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. भाविक-प्रवाशांना विविध सवलतींचा लाभ देत प्रचंड गर्दी, वाहतुकीचा ताण आणि हजारो फेऱ्यांचे नियोजन केले. अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीतही भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली. अशाच प्रकारे संपूर्ण राज्यातील प्रवासी हा आपला ‘विठुराया’ आहे, असे मानून ‘प्रवासी देवो भवः’ या भावनेतून एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सातत्याने आपली सेवा बजावावी, असे आवाहन या निमित्ताने मंत्री सरनाईक यांनी केले आहे.

    “वारीत चालणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या पावलात जशी विठ्ठलभक्ती असते, तशीच या लाखो भाविकांची सेवा करणाऱ्या एसटीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कर्तव्यात मला विठ्ठलसेवा दिसते. आपल्या घरातील सण-उत्सव बाजूला ठेवून दिवस-रात्र सेवा देणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, अधिकारी आणि पडद्यामागे कार्यरत प्रत्येक हाताचे मी मनापासून अभिनंदन करतो. ९ लाखांहून अधिक भाविकांना सुखरूप त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणे, हेच आपल्या एसटी परिवाराने विठुरायाच्या चरणी अर्पण केलेले सेवेचे पुष्प आहे,” असे सरनाईक यांनी सांगितले.

    एसटी महामंडळ ही केवळ प्रवासी वाहतूक करणारी संस्था नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. पंढरीच्या वारीत लाखो भाविकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि सुरक्षित प्रवासानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद, हीच एसटीच्या सेवेची खरी कमाई आहे, असेही सरनाईक यांनी नमूद केले.

    “विठ्ठलाच्या दर्शनाची आस असलेल्या प्रत्येक भाविकाला सुरक्षितपणे पंढरीपर्यंत नेणे आणि पुन्हा सुखरूप घरी पोहोचवणे, हे आमचे कर्तव्यही आहे आणि भाग्यही. ‘लालपरी’ची ही लोकसेवेची परंपरा भविष्यात अधिक सक्षमपणे पुढे नेऊ,” असा विश्वासही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.

    0000

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed