अद्वय हिरे यांच्या रेणुका सूतगिरणी संस्थेच्या नावाने जिल्हा बँकेतून ७.४६ कोटी कर्ज घेतले होते, सदर कर्जाची रक्कम संस्थेसाठी न वापरता त्या रकमेचा गैरवापर वापर केला म्हणून नाशिक जिल्हा बँकेने हिरे विरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात न्यायालयाने हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता.त्यानंतर हिरे फरार झाले होते, आज पोलिसांनी त्यांना मध्यप्रदेशातून ताब्यात घेतलं आहे.
कारवाईला राजकीय रंग असल्याची चर्चा
पालकमंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे हिरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. मालेगाव बाजार समितीत हिरे यांच्या पॅनेलने भुसे यांच्या पॅनलचा पराभव केला होता, त्यांनंतर हिरे भुसे यांच्या राजकीय शीतयुद्ध सुरू आहे, त्यातून हिरे यांच्या कुटुंबाविरोधात अचानक पोलीस सक्रीय झाले आहेत. गेल्या आठवड्यात हिरे यांच्या शैक्षणिक संस्थेच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. आता जिल्हा बँक प्रकरणात त्यांना ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे या कारवाईला राजकीय रंग असल्याची जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा आहे.
विशेष म्हणजे खासदार संजय राऊत विरुद्ध दादा भुसे असं चित्र असताना, मालेगावचे अद्वय हिरे यांनीदेखील दादा भुसे यांच्याविरोधात रणशिंग फुंकलं होतं. त्यानंतर अद्वय हिरे आणि त्यांच्या परिवारावर सूडबुद्धीने कारवाई केली जात असल्याचा आरोप केला जात होता. विशेष म्हणजे आता अद्वय हिरे यांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे.
अद्वय हिरे गेल्या काही दिवसांपासून फरार होते. ते पोलिसांना सापडत नव्हते. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांचा जामीन फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांनी अद्वय हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेतलं आहे. त्यांना नाशिक किंवा मालेगावमध्ये आणलं जाईल. त्यांना उद्या कोर्टात हजर केलं जाऊ शकतं त्यानंतर पुढची कारवाई केली जाईल.
Read Latest Maharashtra News And Marathi News