• Tue. Jun 16th, 2026
    Dombivli Crime : ‘पाणी का वाया घालवतोस?’ विचारणं महागात; डोंबिवलीत सुरक्षारक्षकाला भयंकरपणे संपवलं, तरुणाला बेड्या

    डोंबिवलीत नळ चालू ठेवल्याच्या किरकोळ कारणावरून सुरक्षारक्षकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे ही दुर्दैवी घटना घडली असून, विष्णूनगर पोलिसांनी आरोपी अक्षय जाधव याला अटक केली आहे.

    डोंबिवलीत किरकोळ वादातून सुरक्षारक्षकाची निर्घृण हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    प्रदिप भणगे, डोंबिवली: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात माणसाचा संयम किती सुटत चालला आहे, याची प्रचिती देणारी एक धक्कादायक घटना डोंबिवलीत घडली आहे. नळ चालू ठेवून पाणी वाया का घालवतोस, असा जाब विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाने सुरक्षारक्षकाची धारदार शस्त्राने वार करून निघृण हत्या केली. या घटनेमुळे डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

    नेमका प्रकार काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील कोपर परिसरातील अण्णाभाऊ साठेनगर येथे ही रक्ताळलेली घटना घडली. उमेश वाघ (वय ३५) हे परिसरात सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत होते. बुधवारी परिसरात नळ चालू असल्याने पाणी वाया जात होते. हे पाहून उमेश वाघ यांनी तेथील तरुण अक्षय जाधव (वय ३०) याला नळ चालू ठेवण्याबाबत विचारणा केली आणि पाणी वाया घालवू नकोस असे बजावले. मात्र, हा साधा संवाद अक्षयला इतका जिव्हारी लागला की दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली.

    रागाच्या भरात वार

    वादाचे रूपांतर काही वेळातच हाणामारीत झाले. रागाच्या भरात अक्षयने जवळ असलेल्या धारदार शस्त्राने उमेश वाघ यांच्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात उमेश गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. एका क्षुल्लक कारणावरून एका कष्टाळू व्यक्तीचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Maharashtra TimesNagpur News : एलपीजी काळाबाजारावर पोलिसांचा फास; गॅस एजन्सी, गोदामांवर धडक कारवाई

    पोलीस कारवाई आणि कोठडी

    घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वेगाने तपास चक्रे फिरवत आरोपी अक्षय जाधव याला काही तासांतच ताब्यात घेतले. अक्षयवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्याची गांभीर्य लक्षात घेऊन १६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

    Maharashtra TimesJalna News : कोचिंग क्लासेसमध्ये टँकरमधून पाणी भरताना विजेचा शॉक लागला, 20 वर्षीय तरुण जागेवर गेला, जालनामधील दुर्दैवी घटना
    नळाचे पाणी वाहून जाण्यासारख्या अत्यंत किरकोळ गोष्टीवरून एका तरुणाने हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलल्याने समाजमनातून संताप व्यक्त होत आहे. विष्णूनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा