• Sun. Mar 15th, 2026
    Pune Congress : पुण्यात काँग्रेसला खिंडार, रोहित टिळक यांची पक्षाला सोडचिठ्ठी

    पुणे काँग्रेसमध्ये मोठं खिंडार पडलं आहे. कारण काँग्रेस नेते तथा लोकमान्य टिळकांचे खापरपंतू रोहित टिळक यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. ते आगामी काळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या काही काळात काँग्रेसमध्ये नाराजीचे सूर वाढताना दिसत आहेत. पक्षातील अंतर्गत मतभेद, बदलती राजकीय समीकरणे आणि नेतृत्वाबाबतची नाराजी यामुळे काही प्रमुख नेत्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. त्यामुळे पुण्यात काँग्रेससमोर संघटन टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. कसबा पेठचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनीही पराभवानंतर पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच पुरंदरचे माजी आमदार आणि पुणे ग्रामीण काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय जगताप यांनी संघटनात्मक कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करत काँग्रेसचा राजीनामा दिला. याच पार्श्वभूमीवर पुन्हा काँग्रेसमध्ये नाराज होत आता लोकमान्य टिळकांचे खापरपंतू आणि काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनीही पक्षाला रामराम केला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक घराणे आणि काँग्रेस पक्ष एकनिष्ठ होते. पण आता काँग्रेसचा राजीनामा देण्याची वेळ का आली? यावर रोहित टिळक यांनी मत मांडले आहे.

    रोहित टिळक म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिळक कुटुंब आणि काँग्रेस यांचे घट्ट नाते आहे. त्या काळी काँग्रेस हा केवळ पक्ष नव्हता तर एक चळवळ होती. त्यांच्या आजोबांपासून ते स्वतःपर्यंत कुटुंबाने काँग्रेसकडून निवडणुका लढवल्या. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून पक्षात त्यांच्याबाबत सतत तक्रारी केल्या जात असल्याने दुरावा वाढत गेला.

    लोकमान्य टिळक पुरस्कारावरून वाद

    रोहित टिळक यांच्या ट्रस्टकडून १९८३ पासून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार राजकारण, विज्ञान, अर्थशास्त्र, समाजकार्य अशा विविध क्षेत्रांत मोठे योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. यापूर्वी इंदिरा गांधी, शरद पवार आणि प्रणव मुखर्जी यांनाही हा पुरस्कार देण्यात आला होता. मात्र तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हा पुरस्कार दिल्यानंतर काँग्रेसमधील काही नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्याचे रोहित टिळक यांनी सांगितले.

    काँग्रेसमधील काही नेत्यांवर आरोप

    रोहित टिळक यांच्या म्हणण्यानुसार, पुरस्कार हा सामाजिक स्वरूपाचा असून तो कोणत्याही पक्षाच्या नावाने दिला जात नाही. तरीही पक्षातील काही नेत्यांनी सतत तक्रारी केल्या. “मी अनेकदा स्पष्टीकरण दिले, पण तीच तक्रार वारंवार पुढे केली जात होती. एका सामाजिक पुरस्कारावरून इतका संकुचित विचार केला जात असेल तर पक्षात काम करणे कठीण होते,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

    दोन वर्षांपासून पक्षाचे काम थांबवले

    सततच्या वादामुळे आणि नाराजीमुळे त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून काँग्रेसमधील सक्रिय कामकाज थांबवले होते. परिस्थितीत सुधारणा न झाल्याने अखेर त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

    एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत करणार पक्षप्रवेश?

    पुढील राजकीय वाटचालीबाबत बोलताना रोहित टिळक म्हणाले की, त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्याचा विचार केला होता. पण महाविकास आघाडीकडून शरद पवार यांचे नाव समोर आले. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीवेळी अर्ज दाखल करणे योग्य वाटले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता म्हणून शिंदे यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

    काँग्रेसच्या बदलत्या विचारांवर नाराजी, रोहित टिळकांनी सांगितल्या जुन्या आठवणी

    २००५ मध्ये एनएसयूआयमध्ये असताना पाठ्यपुस्तकात विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो समाविष्ट केल्यावर वाद निर्माण झाला होता. त्यावेळी आंदोलन करण्याचा प्रस्ताव होता. सावरकरांचा फोटो टाकला मग महात्मा गांधींचा का नाही? म्हणून सगळे आंदोलन करणार होते.
    मात्र सर्व क्रांतिकारकांचा आदर राखला पाहिजे, असे मत त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे मांडले होते. त्यानंतर आंदोलन झाले नव्हते, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा