• Thu. Mar 12th, 2026

    मस्तच! स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिक देशात एकविसावे, तर ‘या’ शहराचा नंबर पहिला

    मस्तच! स्वच्छ हवा सर्वेक्षणात नाशिक देशात एकविसावे, तर ‘या’ शहराचा नंबर पहिला

    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयातर्फे स्वच्छ हवा सर्वेक्षणाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ‘स्वच्छ व सुंदर शहर’ अशी बिरुदावली मिळवणाऱ्या नाशिकने देशातील १३१ शहरांमध्ये २१ वा क्रमांक पटकावला. तर, राज्यात नाशिक चौथ्या स्थानावर आहे. या सर्वेक्षणात २०० गुणांपैकी नाशिकला १६०.०३ गुण मिळाले. राज्यात ठाणे पहिल्या, मुंबई दुसरे आणि नागपूर तिसऱ्या क्रमांकावर आहे. गतवेळेपेक्षा नाशिकची कामगिरी उंचावल्याचा दावा महापालिकेच्या पर्यावरण विभागाने केला आहे.

    केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाच्या वतीने ‘नॅशनल क्लीन एअर पॉलिसी’अंतर्गत हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी गेल्या वर्षापासून सर्वेक्षण केले जात आहे. त्यात तीन गटात देशभरातील वर्गवारी केली होती. या सर्वेक्षणात १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशभरातील १३१ शहरांमध्ये नाशिकचा समावेश होता. त्यात हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी शहरांनी केलेल्या कृतींचे मूल्यमापन करून क्रमांक देण्यात आले. केंद्रीय पर्यावरण व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारांची घोषणा केली. त्यात २०० गुणांपैकी १६०.०३ गुण मिळवून नाशिकने देशात २१ क्रमांक पटकावला. तर राज्यांमध्ये नाशिक चौथ्या क्रमांकावर आहे. घनकचरा संकलन, रस्त्यावरील धुळीबाबत केलेल्या उपाययोजना, बांधकाम साहित्याची विल्हेवाट, बांधकामाच्या ठिकाणी वापरण्यात येणाऱ्या सुरक्षित जाळ्या, वाहनांच्या धुरातून होणारे प्रदूषण, ध्वनी प्रदूषणाची तपासणी केल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने दिलेल्या गुणानुसार शहरांना क्रमवारी दिली जाते. त्यात नाशिक देशात २१ व्या क्रमांकावर आले आहे.

    राज्यात चौथा क्रमांक

    गेल्या वेळेस या सर्वेक्षणात नाशिकला १३८ गुण मिळाले होते. परंतु, क्रमवारी मिळाली नव्हती. यंदा स्वच्छ हवेची गुणवत्ता सुधारली असून, नाशिक देशात २१ व्या क्रमांकावर, तर राज्यात चौथ्या क्रमांकावर आल्याची माहिती पर्यावरण विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी दिली. राज्यात ठाणे शहराने पहिला, मुंबई शहराने दुसरा आणि नागपूरने तिसरा क्रमांक पटकावला.
    डिलिव्हरी बॉइजच्या पसंतीस खरी उतरली ‘ई-बाईक’; कोणाकडून होतोय सर्वाधिक वापर?
    इंदूर प्रथम, तर ठाणे तिसरे

    स्वच्छ वायू सर्वेक्षणात १८७ गुण मिळवून इंदूर हे देशात पहिले, तर आग्रा हे १८६ गुण मिळवून दुसरे शहर ठरले. तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रातील ठाणे हे असून, या शहराला १८५ गुण मिळाले आहेत. नाशिक महापालिकेला १६० गुण मिळाले असून, गतसर्वेक्षणात १३८ गुण मिळाले होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *