मागील दोन आठवड्यापासून सातत्याने आणि मुसळधार पावसामुळे लोकल विलंबाने धावत असल्याने एक-दोन अपवाद वगळता सुरळीत सुरू होता. रोज किमान वीस- पंचवीस मिनिटे लोकल उशिराने धावत असल्या तरी नेमहमीच्या ठिकाणी पाणी साचून बंद मात्र पडल्या नाहीत.
‘मायक्रोटनलिंग’चा फायदा
मुसळधार पावसात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करणाऱ्या जलवाहिन्याची क्षमता मर्यादित आहे. निचरा वेगाने होण्यासाठी रुळांखाली लहान आकाराचे बोगदे तयार करण्यात आले आहेत.
मस्जिद बंदर, सँडहर्स्ट रोड, दादर-परळ परिसर, माटुंगा-शीव परिसर, कुर्ला कारशेड, टिळकनगर नाला, दिवा, कळवा, ठाणे- कळवा दरम्यान आणि कळवा-मुंब्रा या ठिकाणी ‘मायक्रोटनलिंग’ची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. यामुळे मुसळधार पाऊस होऊनही वेगाने निचरा झाल्याने पाणी साचले नाही.
पंपांवर भिस्त
२४ संवेदनशील ठिकाणी १० अश्वशक्ती ते १०० अश्वशक्तीचे एकूण १६६ पंम्प कार्यान्वित आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे दरम्यान सर्वाधिक ५१ पंप उभारण्यात आले आहेत.
गाळाची विल्हेवाट
उपनगरी रेल्वेमार्गावरील ११८.४८ किलोमीटर नाले असून यापैकी १०२.३९ किमी नाल्यांमधील गाळ साफ करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आलेली आहे. यामुळे साफसफाईनंतर साचलेला गाळ पावसाच्या पाण्याने पुन्हा नाल्यात आला नाही.
समनव्याचा फायदा
रेल्वे आणि मुंबई महापालिका आपत्ती निवारण केंद्र, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका दरम्यान हॉटलाइन कार्यान्वित आहे. हवामान विभागाचे भाकीत आणि भरती यांची माहिती घेऊन समन्वय साधण्यात येत आहे.
नालेसफाई- पूररोधक द्वार
कुर्ला-ट्रॉम्बे परिसर, चुनाभट्टी, वडाळा रोड, विद्याविहार- लोकमान्य टिळक टर्मिनस आणि टिळकनगर परिसरातील १०५ छोटे नाले (कल्व्हर्ट्स) स्वच्छ केले आहेत. मशीद, भायखळा, माटुंगा आणि शीव -कुर्ला या भागांत पूररोधक द्वार बसविण्यात आले आहे. त्यामुळे पाणी रूळांवर आले नाही.
पावसाळ्याआधी मुंबईतील पाणी भरण्याच्या काही ठिकाणी कामाचे नियोजन केले. त्यांची योग्य अंमलबजावणी केली. स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून दोन्ही यंत्रणांनी जबाबदारी चोख पार पाडली. यामुळे मुसळधार पावसातही लोकल प्रवास विनाव्यत्यय सुरू राहिला.
– डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे
नवी आव्हाने
कल्याण-कसारा
यंदाच्या पावसाळ्यात कल्याण यार्ड हे नवे पाणी भरणारे ठिकाण समोर आले आहे. या ठिकाणी पाणी साचल्याने १९ जुलैला कल्याण-कसारा लोकल वाहतूक बंद झाली होती.
कल्याण-बदलापूर
१९ जुलै रोजी पुरामुळे अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान पाणी साचले. यामुळे जुलै २०१९मध्ये बदलापूर-वांगणी दरम्यानची लोकलसेवा बंद झाल्याची आठवण झाली. कल्याण-बदलापूर हा संभाव्य पूर भाग लक्षात ठेऊन त्यासाठी विशेष उपाय करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त झाली आहे.
जून-जुलै महिन्यात मुंबईतील पाऊस (मिमीमध्ये)
१९ जुलै – २०३
२१ जुलै – २१३
२८ जून – २२८
२४ जून – २२५
(१९ जुलैला रेल्वेघाट मार्गावरील मंकी हिलमध्ये ३०२, लोणावळ्यात २९५ आणि कर्जतमध्ये २९२ मिमी पाऊस बरसला.)