• Sat. Sep 21st, 2024

रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….

रेल्वे पोलीस मागे लागले, गोळी मारण्याची हुल; चेतन रेल्वे रुळांलगतच्या खारफुटीत शिरला अन्….

मुंबई: जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये सोमवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली असून रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर कॉन्स्टेबल चेतन सिंह याला ताब्यात घेतले आहे. सध्या बोरिवली येथील आरपीएफच्या कार्यालयात चेतनची कसून चौकशी सुरु आहे. त्याला दुपारी बोरिवली न्यायालयात हजर केले जाईल. तत्पूर्वी या प्रकारानंतर भाजपच्या स्थानिक आमदार मनिषा चौधरी यांनी बोरिवली स्थानकात धाव घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, सध्या चेतन सिंह याची चौकशी सुरु आहे. मला त्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, असे त्यांनी म्हटले. यावेळी मनिषा चौधरी यांनी रेल्वे पोलिसांनी चेतन सिंह याला कशाप्रकारे पकडले, याचा तपशील सांगितला.

Jaipur-Mumbai Train Firing: ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पळापळ

चेतन सिंह याने ट्रेनमधील चौघांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर मीरारोडमध्ये एक्सप्रेस ट्रेनची साखळी ओढून गाडी थांबवली. त्यानंतर चेतन सिंह याने रेल्वे ट्रॅकवर उडी टाकली आणि तो पळू लागला. रेल्वे पोलिसांना चेतन सिंहला पळताना बघितले. आरपीएफचे जवान त्याच्या मागे लागले. तेव्हा चेतन सिंह याने आरपीएफच्या जवानांना गोळी मारण्याची धमकी दिली. यानंतर चेतन रेल्वे रुळालगत असणाऱ्या खारफुटीत शिरला. मात्र, आरपीएफच्या जवानांनी याठिकाणी जात चेतन सिंहला बेड्या ठोकल्या. आपल्या जीवाची बाजू लावून महाराष्ट्रातील रेल्वे पोलिसांनी चेतन सिंहला पकडले, मी त्यांचे अभिनंदन करते, असे आमदार मनिषा चौधरी यांनी म्हटले.

दरम्यान, चेतनला ताब्यात घेतल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून या घटनेबद्दलची आणखी काही माहिती देण्यात आली. चेतन सुरतहून मुंबईला येत होता. यावेळी वापी येथे चेतन आणि बी-५ बोगीमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये काहीतरी वाद झाला. यामुळे चेतनच्या संतापाचा पारा चढला. त्याने स्वत:कडील रिव्हॉल्व्हर बंद काढून प्रवाशांवर रोखले. यावेळी आरपीएफचे सहायक पोलीस निरीक्षक टिका राम मीना त्याठिकाणी आले. ते प्रवाशांवर पिस्तूल रोखून असलेल्या चेतनची समजूत काढत होते. मात्र, संतापलेल्या चेतनने त्यांच्यावर गोळी झाडली. यानंतर चेतन सिंह याने इतर तीन प्रवाशांनाही गोळ्या घातल्या. चेतन नुकताच सुट्टीवरुन परतला होता. त्याने सर्वात पहिले टिका राम मीना यांच्यावर गोळी झाडली. चेतन सिंह याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो तापट स्वभावाचा होता. भांडणावेळी डोकं फिरल्याने त्याने समोर दिसेल त्याला गोळ्या घातल्या, अशी माहिती रेल्वे पोलीस दलातील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed