काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं काही काळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. तर, बावनदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं काही काळासाठी अवजड वाहतूक थांबवण्यात आली होती. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर काजळी नदीवरील आंजणारी येथील वाहतूक सुरु करण्यात आली आहे. तर, बावनदीच्या पुलावरुन एकेरी वाहतूक सुरु करण्यात आली आहे.
रत्नागिरी,रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन पावसामुळं अलर्ट मोडवर आहे. गेले तीन ते चार दिवस कोकणात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे. यामुळे शेतीचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.
राजापूर बाजारपेठेत पाणी वाढू लागल्याने लोकं आपल्या घरांच्या पहिल्या मजल्यावरती स्थलांतरित झाली आहेत. प्रशासनाकडूनही नागरिकांना स्थलांतरित करण्याची जय्यत तयारी ठेवण्यात आली आहे. या सगळ्या परिस्थितीवर जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग आणि जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकुमार पुजारीआणि त्यांचे प्रशासन लक्ष ठेवून आहे. उपविभाग व तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना सूचना देण्यात आल्या असून संगमेश्वर व राजापूर प्रशासन ऑन फिल्ड आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यात पेण तालुक्यात पावसाने १० वर्षाचा उच्चांक गाठल्याने हेटवणे धरण ओव्हर फ्लो झाले आहे. ६ दरवाजे २ फुटांनी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील अंबा नदी व कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीजवळून वाहत आहेत तर महाड येथील सावित्री नदी इशारा पातळी जवळ आहे. महाड पोलादपूर परिसरातही प्रांताधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे व मुख्याधिकारी महादेव रोडगे यांचे प्रशासन लक्ष ठेवून आहे.