जागतिक स्तरावर वाढत चाललेल्या युद्धांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. भारताने जागतिक शांततेसाठी पुढाकार घेऊन ‘शांततेचे नेतृत्व’ करावे, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे.
भारताची परंपरा ही अहिंसा, सत्य आणि शांततेची राहिली
अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे की, युद्धामुळे केवळ विनाश, मृत्यू आणि अस्थिरता निर्माण होते. युद्धात सर्वाधिक बळी हा निष्पाप नागरिकांचा जातो. त्यामुळे जगात वाढत चाललेल्या संघर्षांमध्ये संवाद आणि शांततेचा मार्ग शोधणे अत्यंत गरजेचे आहे. भारताची परंपरा ही अहिंसा, सत्य आणि शांततेची राहिली आहे. त्यामुळे भारताने केवळ प्रेक्षकाची भूमिका न घेता जागतिक स्तरावर शांततेसाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
संवादातून शांततेचा मार्ग
भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असून अनेक देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवतो. त्यामुळे भारताने आपली नैतिक ताकद आणि राजनैतिक प्रभाव वापरून युद्धग्रस्त देशांमध्ये संवादाचे पूल उभे करावेत, अशी अपेक्षा अण्णा हजारे यांनी व्यक्त केली आहे. युद्धातून कधीच कायमस्वरूपी समाधान मिळत नाही, तर संवादातूनच स्थैर्य आणि शांततेचा मार्ग सापडतो, असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले.
Raigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ
भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे नेतृत्व करावे
जागतिक तणाव वाढत असताना भारताने तटस्थ, संयमी आणि जबाबदार भूमिका घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे नेतृत्व करावे, असे आवाहन अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना केले आहे. त्यांच्या या पत्रामुळे पुन्हा एकदा भारताने जागतिक शांततेत मोठी भूमिका बजावावी, अशी चर्चा राजकीय आणि सामाजिक वर्तुळात सुरू झाली आहे.
