• Sat. Sep 21st, 2024

Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ

Rain: कोल्हापूरसाठी पुढील २४ तास महत्त्वाचे; धरण क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पातळीत पुन्हा वाढ

कोल्हापूर: पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने गेल्या २४ तासापासून पंचगंगेची पाणी पातळी स्थिरावली होती. मात्र दुपारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पंचगंगेच्या पाणी पातळी पुन्हा वाढ होऊ लागली आहे.पंचगंगेची पाणी पातळी ४० फुट ८ इंचावर पोहोचली असून सोबतच राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे गेल्या २४ तासांहून अधिक काळ सुरू असल्याने स्वयंचलित दरवाजामधून सुमारे आठ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे. राधानगरी मधून सुरू असलेला विसर्ग आणि मुसळधार पाऊस यामुळे पुन्हा पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच हवामान खात्याने कोल्हापूरला उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामुळे पुढील २४ तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे ठरणार असून पाणी पातळीत वाढ झाल्यास उपाययोजना करण्यासाठी यंत्रणा देखील सतर्क झाले आहेत.

पुढील २४ तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे

काल राधानगरी धरण शंभर टक्के भरल्याने धरणाचे सातपैकी ५ स्वयंचलित दरवाजे उघडले. यामुळे गेल्या २४ तासांपासून राधानगरी धरणातून तब्बल ७ हजार १४० क्यूसेक तर पावर हाऊस मधून १४०० क्यूसेक असा ८ हजार ५४० पाण्याचा विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने आणि पाणी पुढे सरकत राहिल्याने गेल्या 24 तासांपासून पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ झाली नाही मात्र दुपारपासून पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने पंचगंगा आता संत गतीने वाढत आहे. पंचगंगा नदी सध्या 40 फूट 8 इंचावर पोहोचली असून तब्बल 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पंचगंगेची वाटचाल सध्या धोका पातळीकडे सुरू असून पंचगंगेची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. दरम्यान हवामान खात्याने देखील उद्या कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असून पुढील 24 तास कोल्हापूर जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.

राधानगरी १०० टक्के भरले; कोल्हापुरात ८० बंधारे पाण्याखाली, पंचगंगा धोका पातळीच्या दिशेने

कर्नाटकच्या आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग

कोल्हापूर जिल्ह्यात उगम पावणारी पंचगंगा ही पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. तर कृष्णा नदी पुढे सांगली जिल्ह्यातून कर्नाटकातील अलमट्टी धरणामध्ये जाते. सध्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीचे पाणी आणि पंचगंगेचे पाणी एकत्र आल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळी देखील वाढ होऊ लागली आहे. तर अलमट्टी धरणात ८१.८४ टीएमसी पाणीसाठा झाला असून, धरण ६६ टक्के भरले आहे. धरणात एक लाख ६१ हजार ७४७ क्युसेकने पाण्याची आवक होत आहे. म्हणून आलमट्टी धरणातून आज दुपारी चार वाजल्यापासून १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला काही प्रमाणात धीर मिळाला आहे. तसेच कर्नाटक आणि महाराष्ट्र जलसंधारण प्रशासन एकमेकांच्या संपर्कात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed