खालापूरच्या इर्शाळवाडी येथे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दरड कोसळली होती. या दुर्घटनेत एकूण ८४ जणांची आपला जीव गमावला. त्यापैकी २७ मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले. उर्वरित मृतदेह तिथेच सोडून ही बचावमोहीम थांबवण्यात आली होती. या दुर्घटनेनंतर बचावकार्यासाठी आजुबाजूच्या जिल्ह्यातून अनेक बचाव दल दाखल झाले. या बचाव कार्यात मदतीसाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे जवान देखील दाखल झाले होते. बुधवारी १९ तारखेला झालेल्या या दुर्घटने दरम्यान ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे ८ जणांचे एक पथक महाड येथे पूर जन्य परिस्थितीमुळे बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आलं होते. या पथकाला रात्रीच्या दरम्यान या घटनेबाबत माहिती मिळताच हे ८ जणांचे पथक २० तारखेला सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी दाखल झालं. नंतर ठाण्यातून १५ जणांची दुसरी तुकडी असे एकूण २३ जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी घटनास्थळी २ ते ३ घरं दिसत होती आणि संपूर्ण परिसर गाळाने भरलेला होता. या पथकाने ५ दिवस युद्ध पातळीवर कार्य करून अनेक मृतदेह बाहेर काढले. तर कार्य सुरु केल्याच्या या पथकाने १२ तासांत एक ६० वर्षीय वृद्ध महिला रामी पारधी हिला सुखरूप बाहेर काढून तिला रुग्णालयात उपचारासाठी पाठवले.
आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे हे पथक ठाण्यातील अद्ययावत आणि उत्तम प्रशिक्षित अशी स्पेशल फोर्स आहे. या उत्तम प्रशिक्षित ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या जवानांसमोर बचाव कार्यादरम्यान अनेक आव्हानं उभी राहिली. या परिसरात कमरेपर्यंत गाळ (भूस्खलनाचा मलबा) पसरला होता. जवळपास पाच दिवस गाळात उतरून या जवानांनी मृतदेह बाहेर काढत कर्तव्य बजावले. या बचाव कार्यादरम्यान जवानांच्या पायांना गुडघ्यापासून खाली मोठया प्रमाणात जखमा झाल्याचे ठाणे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे वरिष्ठ जवान सचिन जाधव यांनी सांगितले.
या ठाण्याच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या स्पेशल फोर्सच्या पथकाने कर्तव्यदक्ष राहून इर्शाळवाडी परिसरात झालेल्या भूसख्खलन झालेल्या परिसरात मदतकार्य करण्यासाठी गेलेल्या टीडीआरएफ टीम तीन दिवसाच्या मदतकार्यानंतर यशस्वीरित्या ठाणे महानगर पालिकेत परतून केलेल्या कौतुकास्पद कार्याबद्दल ठाणेकरांनी कौतुक केलं आहे. त्यांचे ठाणे महानगर पालिकेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.