Dombivli Traffic: डोंबिवली स्टेशनबाहेर प्रंचड गर्दी असते. त्याप्रमाणात वाहतूक कोंडी देखील जास्त आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी रिंग रोड हा उपाय ठरणार आहे.
म्हणून काम रखडले
एमएमआरडीएच्या माध्यमातून या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या मार्गातील अतिक्रमणे हटवून जागा मोकळी करून देताच रस्त्यासाठी कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया सुरू केली जाईल. कोपर ते भोपरपर्यंतच्या मार्गात काही परिसरांतील इमारती बाधित होत असल्याने या मार्गाला विरोध होत होता आणि त्यामुळे काम रखडले होते.
नव्या आरेखनाला मंजुरी दिली
यामुळेच या रस्त्याचे संरेखन बदलण्याची मागणी होत होती. अखेर प्रशासनाने या मार्गाचे आरेखन बदलले असून, काही भाग खाडीकिनारी भागातून वळवला आहे. या नव्या आरेखनाला महासभेने मंजुरी दिली आहे. हा बहुतांश भाग मोकळा असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया राबविणे सुकर होणार आहे. तसेच टप्पा तीनच्या धर्तीवर दुप्पट टीडीआरच्या माध्यमातून या जागा ताब्यात घेणे सोयीचे होणार असल्याने तुलनेने या रस्त्याचे काम सुरू करणे शक्य होईल, असे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सांगितले.
उड्डाणपुलाचे काम सुरू
राज्य सरकार आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्राभोवती फिरणारा तसेच कल्याण आणि डोंबिवली शहरांतील प्रत्येक भाग जोडण्यासाठी आठ टप्प्यांत रिंगरोड प्रस्तावित आहे. यातील टप्पा क्र.४ ते ७ या दुर्गाडी ते टिटवाळा रस्त्याचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झाले आहे. टप्पा क्र. ३ ते ४ या दुर्गाडी ते मोठागावपर्यंत खाडीकिनाऱ्यावरून जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
Tukaram Mundhe : FDAचा धडाका! IRCTC, इस्कॉनशी संबंधित कँटिनवर कारवाईची तलवार, भेसळीवरही स्ट्राईक; कोणाचे परवाने निलंबित?
पर्यायी मार्ग उपलब्ध
या मार्गामुळे कल्याण ते डोंबिवली हे अंतर सहा मिनिटांत गाठता येणार आहे. मात्र, डोंबिवली पूर्वेकडील कोंडी फोडण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या रिंगरोड टप्पा क्र. १ आणि २चे काम रखडले होते. हा मार्ग कोपर रेल्वे स्थानकाजवळून थेट आयरे रोडमार्गे भोपरकडून काटई नाक्यापर्यंत जाणारा असून, काटई नाका येथे कल्याण-शीळ रस्त्याला जोडला जाणार आहे. त्यामुळे डोंबिवलीतून बाहेर पडण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
दरम्यान नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयरे गावात देखील आरेखन बदलण्याची केलेल्या सूचनेनुसार बदल करत नकाशा अंतिम केला जाणार असल्याचे नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
CSMT–Sawantwadi train: आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी ‘मेसेज’;चा गोंधळ,कोकणकर हैराण
प्रवाशांना दिलासा मिळणार
डोंबिवलीलगतच्या जुन्या प्रीमियम कंपनीच्या जागेवर आणि २७ गावांमध्ये मोठमोठी संकुले उभी राहिली आहे. या परिसराला डोंबिवली हे एकमेव रेल्वे स्थानकअसल्याने डोंबिवली स्थानकावरील गर्दीचे प्रमाण काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गर्दीमेळे अनेक प्रवाशांनी जीव गमवाला असून अपघातांची संख्या वाढली आहे. प्रवाशांच्या संख्येमुळे स्टेशन परिसरात रिक्षा अपुऱ्या पडतात. प्रवाशांना तासनतास रिक्षांची प्रतीक्षा करत रांगेत थांबावे लागते. या गर्दीवर आणि मानपाडा रोडपर्यंत होणाऱ्या कोंडीवर रिंग रोड हाच एकमेव पर्याय असल्याने या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
