राज्यामध्ये १ जूनपासून २४ जुलैपर्यंत सरासरी ४४४.१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस सरासरीपेक्षा तीन टक्क्यांनी कमी आहे. कोकण विभागामध्ये आत्तापर्यंत सिंधुदुर्गात सर्वाधिक, ३७ टक्के तूट आहे. मात्र, तिथे १ हजार मिमीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. रत्नागिरी आणि ठाणे ‘सरासरी’ श्रेणीत आहेत. पालघर येथे ‘तीव्र अतिरिक्त’, तर मुंबई शहर, उपनगर, रायगड येथे ‘अतिरिक्त’ पाऊस नोंदला गेला आहे.
Mumbai Local Update: विकेंडला मुंबईकरांचे हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक
या अतिरिक्त आणि तीव्र अतिरिक्त पावसाने राज्याचे एकूण पर्जन्यमान सुधारले आहे. मध्य महाराष्ट्रात नाशिक, पुणे येथे तीव्र अतिरिक्त आणि सातारा येथे अतिरिक्त पाऊस झाला आहे. अहिल्यानगर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली हे जिल्हे सरासरीच्या श्रेणीमध्ये आहेत. राज्यात सर्वाधिक तूट नंदुरबारमध्ये आहे. मध्य महाराष्ट्राचे पाऊसमान अतिरिक्त नोंदले गेले आहे.
मात्र, विदर्भ, मराठवाड्यात स्थिती कठीण आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव सध्या ‘सरासरी’च्या श्रेणीत आहेत. येत्या दोन आठवड्यांमध्ये राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या ‘सरासरी’च्या टप्प्यात असलेल्या जिल्ह्यांमध्ये तूट निर्माण होऊ शकेल. या दृष्टीने नियोजन गरजेचे असल्याचे भारतीय हवामान विभागाच्या हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे माजी प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
किनारपट्टीच्या प्रणालींचा फायदा
विदर्भामध्ये भंडारा, बुलडाणा, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पाऊस सध्या सरासरीच्या श्रेणीत आहे. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळमध्ये पावसाची तूट आहे. काही वेळा पूर्व किनारपट्टीवरील प्रणालींचा विदर्भाला फायदा झाल्याने मराठवाड्याच्या तुलनेत दिलासा मिळू शकतो, असेही होसाळीकर यांनी सांगितले.
‘पावसाचा पट्टा दुर्मीळ नाही’
शुक्रवारी दिवसभरात सोशल मीडियावर, उत्तर भारतापासून हिमालयावरून चीनमार्गे दक्षिण कोरियापर्यंत पसरलेला १० हजार किलोमीटर लांबीचा पावसाचा एक अवाढव्य पट्टा दिसत असल्याची चर्चा होती. हा पट्टा उपग्रह प्रतिमांमध्ये टिपला गेला असून यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडू शकतो, असे सांगितले जात होते. मात्र ही माहिती चुकीची असल्याचे निवृत्त हवामान विभाग अधिकारी अनुपम काश्यपी यांनी सांगितले. पावसाळ्याच्या काळात पूर्व आशियाई प्रदेशापासून दक्षिण चीन ते कोरियाच्या पट्ट्यापर्यंत ढगांचा पट्टा दिसू शकतो. मात्र हे दुर्मीळ नाही. यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, पूर येईल अशा चर्चा खोट्या असल्याचे पुण्याच्या प्रादेशिक हवामान विभागातील हवामानशास्त्रज्ञ सखा सानप यांनी सांगितले.
Mumbai Water Cut: सातपैकी चार धरणं तुडुंब भरली, ओसंडून वाहू लागली; पण मुंबईतील पणीकपात कायम; ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कमी पावसाचा अंदाज
मुंबईतील आजचं हवामान कसं असेल?
आषाडी एकादशीला महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस पडतोच. पण सध्या मुंबईतील पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईत यलो अलर्ट देण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता. २५ जुलै रोजी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रागयगड जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुण्यात-नाशिकमध्ये परिस्थिती काय?
पुण्याच्या घाटमाथा परिसरात आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने झोडपलं आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली. पुणे घाट परिसरात शनिवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
