Palghar News : पालघर रेल्वे स्थानकानजीक रेल्वेची धडक लागल्याने भीषण असा अपघात घडला आहे. या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
पालघर येथे कामासाठी वास्तव्यास असलेल्या तिघांनी पालघर पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून पूर्वेकडे जात होते. पालघर पश्चिमेला असलेल्या हनुमान मंदिर परिसरातील दशकांपासून बंद असलेल्या फाटकातून हे तिघेही कामगार रेल्वे रूळ ओलांडू लागले. रेल्वे रूळ ओलांडताना मुंबईहून जयपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे ट्रेनने तिघांना धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर रित्या जखमी झाला आहे. हे तिघेही बोईसर पूर्वेला असलेल्या एका उद्योगात वेल्डिंग व इतर काम करणारे असून मूळचे बिहार राज्यातील मोतीयारी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. तीन तरुण सुट्टी असल्याने पालघरमध्ये आले होते.
भरधाव स्कॉर्पिओने दुचाकीला उडवले, नंतर दुचाकीस्वारांना ३०० मीटरपर्यंत फरफटत नेले; थरारक घटनेत दोघांचा मृत्यू
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती देखील चिंताजनक आहे. तर अन्य दोघांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, आज मध्यप्रदेशातूनही एक धक्कादायक प्रकार समोर आला होता. ट्रेन क्रमांक १२१४९ पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये धक्कादायक असा प्रकार घडला आहे. जबलपूर रेल्वे स्टेशन स्थानकात रेल्वे कर्मचारी ट्रेनच्या रोलिंग आणि अंडर गियरची तपासणी करत होते. यावेळी त्यांना एसी कोचच्या खालील ट्रॉलीमध्ये एक तरुण झोपला असल्याचे आढळले. हे पाहून कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने बाहेर काढले आणि त्याची चौकशी सुरु केली. तो तरुण इटारसी स्थानकापासून ट्रॉलीत झोपून प्रवास करत असल्याचे त्याने चौकशीत सांगितले. हे ऐकून कर्मचाऱ्यांना धक्काच बसला होता. चौकशीत असे समोर आले की, त्याने तब्बल २९० किलोमीटर अंतर ट्रॉलीत झोपून कापलं. याप्रकरणी पश्चिम मध्ये रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी त्या तरुणाला पकडून आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले.

