• Sat. Sep 21st, 2024

टँकरची घरघर, मराठवाड्यातील ६४७ गावांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

टँकरची घरघर, मराठवाड्यातील ६४७ गावांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा, पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: गेल्या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्यामुळे, यंदा टंचाई जाणवण्यास सुरुवात झाली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांतील परिस्थिती बिकट होत आहे; तर काही दिवसांपर्यंत मोजके टँकर असणाऱ्या बीड, लातूर या जिल्ह्यांतील टँकरची संख्याही वाढली आहे. टँकरमुक्त असलेला धाराशीव जिल्ह्यातील अनेक गावातही आता टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. वाढत्या पाणी टंचाईमुळे अवघ्या २० दिवसांतच तहानलेल्या गावाची संख्या ३५४वरून थेट ६४७ वर पोहोचली आहे. परिणामी, पाणीपुरवठा करणाऱ्या टँकरच्या संख्येतही आणखी भर पडली असून, सध्या विभागातील ४९७ गावे व १५० वाड्यांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, अशी माहिती विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.गेल्या उन्हाळ्यापासून छत्रपती संभाजीनगरसह विभागातील अन्य जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. पावसाळ्यात व त्यानंतर काही प्रमाणात टँकरच्या संख्येत घट झाली होती. विभागातील अनेक जिल्हे टप्प्या-टप्प्याने टँकरमुक्त झाले; मात्र छत्रपती संभाजीनगर, जालना त्यास अपवाद ठरले. सर्वदूर दमदार पाऊस नसल्याने या जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न कायम राहिला. परिणामी, कायमस्वरूपी पाण्याचे स्रोत नसलेल्या; तसेच पाणीपुरवठा योजना नसणे वा बंद असलेल्या गावाना टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला.

पाणीप्रश्न गंभीर

छत्रपती संभाजीनगर, जालना या दोन जिल्ह्यांतील तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असतानाच, गेल्या महिन्यात बीड व लातूर जिल्ह्यातील दोन ते तीन गावांत टँकर सुरू झाले. उन्हाची तीव्रता वाढताच मराठवाड्यातील पाणी प्रश्नही गंभीर होत चालला आहे. वीस दिवसांपूर्वी या चार जिल्ह्यांतील २७६ गावे व ७८ वाड्यांना मिळून ४५० टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता. तर आता या चार जिल्ह्यांसह पाणीटंचाईग्रस्त यादीत धाराशीव जिल्ह्याचाही समावेश झाला आहे. सध्याच्या घडीला या पाच जिल्ह्यांतील मिळून ४९७ गावे व १५० वाड्यांना ७६३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

५ ते ७ वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता! अर्चना पाटील भाजपमध्ये; फडणवीसांनी घटनाक्रम सांगितला

तीन जिल्हे टँकरमुक्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २४० गावे व ४५ वाड्यांना ३८५ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यातील १४८ गावे ५५ वाड्याना २३५ टँकरद्वारे, बीड जिल्ह्यातील ८० गावे व ५० वाड्यांना ९३ टँकरद्वारे; तर धाराशिव जिल्ह्यातील २२ गावांना ४२, तसेच लातूर जिल्ह्यातील सात गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तर सुदैवाने परभणी, हिंगोली व नांदेड जिल्हे अद्याप तरी टँकरमुक्त आहेत.

११०९ विहिरींचे अधिग्रहण

विभागीय आयुक्तालयाच्या २६ मार्च रोजीच्या अहवालानुसार मराठवाड्यातील एक हजार १०९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २०५, जालना २५१, परभणी १३, हिंगोली ६, नांदेड ३, बीड १०१, लातूर ११० आणि धाराशिव जिल्ह्यात ४२० विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. यात टँकरसाठी ३४२ गावांतील ३६१ विहिरींचे; तर टँकर व्यतिरिक्त ५०६ गावांतील ७४८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

धरणात पाणी कमी म्हणून ७० हजार कोटीचा घोटाळा करणाऱ्या अजित पवारांना सोबत घेतलं, माजी आमदाराचा टोला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिस्थिती

तालुका गावे वाड्या टँकरची संख्या

छत्रपती संभाजीनगर ३८ १४ ५१

फुलंब्री ३५ १ ४६

पैठण ४६ २ ६४

गंगापूर ४० ४ ८६

वैजापूर ४४ ७ ५७

कन्नड ८ ० १४

सिल्लोड २९ ७ ६७

सोयगाव ० ० ०

खुलताबाद ० ० ०

एकूण २४० ४५ ३८५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed