• Sat. Sep 21st, 2024

नाव चर्चेत, पण उमेदवारी मिळेल का? महिला उमेदवारीसाठी प्रमुख पक्षांकडूनही आखडता हात

नाव चर्चेत, पण उमेदवारी मिळेल का? महिला उमेदवारीसाठी प्रमुख पक्षांकडूनही आखडता हात

ठाणे : देशाचे पंतप्रधानपद महिलेने भूषवलेले असताना, विद्यमान राष्ट्रपती आणि वित्तमंत्री महिला असतानाही, निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देताना प्रमुख राजकीय पक्षांकडून कायमच हात आखडता घेतला जात आहे. यापूर्वी ठाणे आणि पालघर जिल्ह्यात झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये उमेदवारीची संधी मिळालेल्या महिलांची संख्या खूपच कमी होती. त्यांनाही पराभवाचा सामना करावा लागला होता. ठाणे जिल्ह्यात तीन, तर पालघर जिल्ह्यात एक लोकसभा मतदार संघ असून, या दोन्ही जिल्ह्यांतील महिला मतदारांची संख्या ४० लाखाहून जास्त असून, त्यातही ठाणे जिल्ह्यात ३० लाख महिला मतदार आहेत. महिला मतदारांची संख्या मोठी असूनही उमेदवारींसाठी महिलांचा विचार होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

ठाणे जिल्ह्यातून १८ आमदार विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करतात. त्यापैकी गीता जैन (मिरा-भाईंदर) आणि मंदा म्हात्रे (बेलापूर) या दोनच महिला आमदार आहेत. तर, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदार संघामध्ये एकही महिला आमदार नाही. गंभीर बाब म्हणजे, पालघर जिल्ह्यात मातामृत्यू, कुपोषण आणि महिला संदर्भातचे अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, राजकीय पक्षांकडून उमेदवार घोषित केले जात आहेत. परंतु, यंदाही लोकसभेच्या निवडणुकीत महिलांना रिंगणात उतरवण्यात प्रमुख राजकीय पक्ष उदासीन असल्याचेच दिसत आहे.

यापूर्वीही महिलांना अल्प संधी

– चंद्रिका केनिया : सन १९९८च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदार संघातून चंद्रिका केनिया यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. या निवडणुकीत त्यांना तब्बल तीन लाख मते मिळाली होती.

– वैशाली दरेकर-राणे : सन २००९च्या निवडणुकीमध्ये कल्याण लोकसभा मतदार संघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वैशाली दरेकर-राणे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. त्यांचाही पराभव झाला. त्यांना मिळालेल्या मतांची संख्या एक लाखांपेक्षा जास्त होती.

– अपक्ष महिला उमेदवार : काही निवडणुकांमध्ये ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदार संघामध्ये अपक्ष, तसेच अन्य पक्षांच्या तिकिटांवर महिलांनी निवडणूक लढवली आहे. यापैकी कोणीही निवडून आले नाही. आतापर्यंत झालेल्या निवडणुकीमध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून निवडणूक लढवणाऱ्या महिला उमेदवारांची संख्या देखील अत्यंत नगण्य आहे.
Lok Sabha 2024: मुंबई उपनगरांत आता मतदारांची संख्या ७३ लाखांवर, दोन महिन्यांत वाढले ८३ हजार मतदार
यांची नावे चर्चेत, उमेदवारी मिळणार का?

सद्यस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यातील महिला मतदारांची संख्या ३० लाख असून, त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यापैकी ठाणे लोकसभा मतदार संघात ११ लाख ३० हजार, कल्याण ९ लाख ३९ हजार आणि भिवंडी मतदार संघात ९ लाख ३५ हजारांच्या आसपास आहे. पालघर जिल्ह्यात १० लाखांच्या आसपास महिला मतदार आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील महिला मतदारांची एकूण संख्या ४० लाखांपेक्षा जास्त असून, पालघर लोकसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेवारीसाठी भारती कामडी यांच्या नावाची चर्चा आहे. तर, ठाणे लोकसभा मतदार संघात अन्य नावांसह शिवनेसेकडून (शिंदे गट) माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे, तसेच कल्याण लोकसभा मतदार संघात ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचेही नाव चर्चेत आहे. नावे चर्चेत असली, तरी प्रत्यक्षात महिलांना उमेदवारी मिळणार का, हा प्रश्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed