• Sat. Sep 21st, 2024
‘शिरूरचा खासदार डायलॉगबाजीत वस्ताद’, अजित पवारांची अमोल कोल्हेंवर जोरदार टीका

म. टा. प्रतिनिधी, मंचर/पुणे: ‘सध्याचा खासदार डायलॉगबाजी करण्यात वस्ताद आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी घाम गाळावा लागतो. चित्रपट, मालिका तेवढ्यापुरते पाहू; पण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि त्यांच्या हाकेला धावून जाणारा माणूस खासदार म्हणून निवडून द्यावा लागतो,’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर मंगळवारी टीकास्त्र सोडले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पवार यांनी शिरूर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली.मंचर येथील कार्यक्रमात शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि शेकडो कार्यकर्त्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आणि ‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार दिलीप मोहिते पाटील, अतुल बेनके यांच्या उपस्थितीत ‘राष्ट्रवादी काँग्रेस’मध्ये प्रवेश झाला.

‘आढळरावांची घरवापसी झाली आहे. कोल्हे यांना मी शिवसेनेतून ‘राष्ट्रवादी’त आणून खासदार केले. त्यांची घरवापसी करायची झाली, तर शिवसेना, मनसे असे अनेक पक्ष शोधावे लागतील, असा टोला पवार यांनी लगावला. ‘नेता पराभूत होत नसेल, तर कलाकाराला समोर उभे करावे लागते. याचप्रमाणे मी कोल्हे यांना आढळरावांच्या विरोधात उभे केले. आढळरावांचा पराभव करताना आमच्या तोंडाला फेस आला होता,’ अशी कबुली देऊन आता त्याच आढळरावांना पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन पवार यांनी केले.

जागावाटपावरुन महायुतीत रस्सीखेच, ‘या’ चार जागांसाठी मुख्यमंत्री शिंदे आग्रही, भाजपसमोर लेखाजोखाच मांडला

‘शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची भूमिका केली, असे कोल्हे सांगतात; पण त्यांनी नथुराम गोडसेचीही भूमिका केली होती. हे सांगितले, तर काँग्रेसचे लोक त्यांना मतदान करतील का,’ असा सवाल त्यांनी केला.

‘वीस वर्षांनी मी राष्ट्रवादीत’

‘राजकारणात भांड्याला भांडे लागते. दिलीप मोहिते यांच्याशी वैयक्तिक हेवेदावे नव्हते. अनेक पर्याय असताना अजित पवार यांनी मला पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. मी २० वर्षे बाणाशी प्रामाणिक राहिलो. आता पुन्हा ‘राष्ट्रवादी’त आलो आहे,’ अशी भावना शिवाजीराव आढळराव यांनी व्यक्त केली. ‘बेडूकउडी अशी टीका करणाऱ्या माझ्या मित्राने मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी असा प्रवास केला आहे,’ असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला.

गोडसेंची भूमिका केली हेही सांगा, अजित पवारांनी इतिहास काढत अमोल कोल्हेंना भर सभेत घेरलं

शहरी भागातला मतदार कमळ दिसले नाही, की परत जातो. कमळ, बाण आणि घडाळ्याला मत म्हणजे नरेंद्र मोदींना मत हे सांगावे लागणार आहे. शहरात कमळ आणि जिल्ह्यात घड्याळ व बाण चालवायचा आहे, हे मनात ठसवा.

– अजित पवार, उपमुख्यमंत्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed