राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणा संदर्भात मराठवाड्यासाठी जीआर काढला असल्यामुळे प्रमाणपत्र मिळवून देण्याची जबाबदारी ही राज्य सरकारचीच आहे असे म्हणत मराठा नेते मनोज जरांगे पाटील सरकारवरती तोफ डागली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नसेल तर, मराठवाड्यातील मराठा समाजातील लोकांनी उद्यापासून आपापल्या भागातील आमदारांना प्रमाणपत्र का मिळत नाही याबाबत विचारणा करण्याचे आवाहन त्यांनी केले. लातूर जिल्ह्यातील माकणी थोर येथे आयोजित एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी मराठा आरक्षणाचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी मराठवाड्यातील जो आमदार पुढे येणार नाही, त्यांना २०२९ च्या निवडणुकीत पाडल्याशिवाय राहणार नाही, असं विधान जरांगेंनी केलं.