२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईतील ३६ पैकी २५ जागा लढवल्या. मनसेनं जवळपास पावणे पाच लाख मतं घेतली. आता मनसे महायुती गेल्यास ही सगळी मतं कोणाला मिळणार हा चर्चेचा विषय आहे. मनसेनं मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईत ४.६२ लाख मतं घेतली होती. यातील सर्वाधिक १.२३ लाख मतं उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघातून मिळाली होती. मुलुंड, विक्रोळी, भांडूप पूर्व, घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर पूर्व या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी चांगली मतं घेतली. मानखुर्द शिवाजीनगरमधून मनसेनं उमेदवार दिला होता.
मनसे महायुतीत गेल्यास, २०१९ मध्ये मनसेला मिळालेली मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्यास गणितं बदलू शकतात. भाजपनं ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळू शकते. मागील दोन निवडणुका ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढले. त्यांचा सव्वा दोन लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. दोन्ही वेळा इथून भाजप उमेदवार विजयी झाले. आता कोटेचा यांना मनसेची साथ मिळाल्यास त्यांना लढत सोपी होऊ शकते.
अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन-कोळीवाडा, वडाळा, माहीम या मतदारसंघांतून मनसेला ९६,४९८ मतं मिळाली होती. हे विधानसभा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात येतात. शिवसेनेचे राहुल शेवाळे इथले खासदार आहेत. या मतदारसंघावर राज यांनी शहांसोबतच्या बैठकीत दावा सांगितला. पण ती जागा शिंदेंकडे असल्याचं उत्तर शहांनी दिलं. या मतदारसंघात शिवसेनेला मनसेची साथ मिळाल्यास त्यांच्यासाठी विजय सोपा होऊ शकतो.
२०१९ मध्ये मनसेनं उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघांत उमेदवार दिले होते. दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्वेतून मनसेचे उमेदवार रिंगणात होते. त्यांनी ६८,२४४ मतं घेतली. विशेष म्हणजे मागाठाण्यात मनसेच्या नयन कदम यांनी ४१,०६० मतं घेतली. ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. उत्तर मुंबईतून भाजपनं केंद्रीय पियूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी गेल्या निवडणुकीत जवळपास पावणे पाच लाख मतांनी विजयी झाले होते. त्यात मनसेच्या मतांची भर पडल्यास गोयल विक्रमी मताधिक्क्यानं विजयी होऊ शकतात.