• Mon. Jun 8th, 2026

    Imtiaz Jaleel : ‘चक्क मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनवले बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड अन् कास्ट सर्टिफिकेट’; जलील यांचा गंभीर आरोप

    Imtiaz Jaleel : ‘चक्क मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या नावे बनवले बनावट आधारकार्ड, रेशनकार्ड अन् कास्ट सर्टिफिकेट’; जलील यांचा गंभीर आरोप

    माजी खासदार इम्तियाज जलील यांनी गंभीर आरोप केले आहेत. रमाई घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांनी आपल्या आरोपांचे पुरावे देखील पत्रकार परिषदेत दाखवले.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : रमाई घरकुल योजनेच्या नावाखाली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी रुपयांचा महाघोटाळा सुरू असल्याचा खळबळजनक आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. या घोटाळ्याची भीषणता इतकी धक्कादायक आहे की, चक्क राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, रेशन कार्ड आणि कास्ट सर्टिफिकेट (जातीचे दाखले) तयार करून योजनेचा पैसा लाटण्याचा आरोप इम्तियाज जलील यांनी केला.

    इम्तीयाज जलील यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेल्या कागदपत्रांमुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने चक्क ‘महार’ जातीचे दाखले काढण्यात आले आहेत. एवढेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड बनवून त्यात त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावेही समाविष्ट करण्यात आली आहेत. याच नावांनी बनावट आधार कार्ड तयार करून घरकुल योजनेसाठी अर्ज करण्यात आले आहेत, असा दावा जलील यांनी केला आहे.

    भाजप नेते आणि अधिकाऱ्यांवर थेट निशाणा

    शहरातील काही नेते गेल्या अनेक वर्षांपासून गरिबांच्या हक्काचा पैसा लाटत असल्याचा गंभीर आरोप जलील यांनी केला. मंत्र्यांच्या दबावाखाली महापालिका आयुक्तांनी कोटींच्या फाईलवर स्वाक्षरी केली असून या घोटाळ्यात काही बड्या नेत्यांचा समावेश असल्याचा दावा करत जलील यांनी त्यांच्या फाईल्सची आकडेवारीच जाहीर केली आहे. या प्रकरणी विभागाच्या विभागप्रमुखावर सही करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.

    आता थेट न्यायालयात होणार लढा

    प्रशासनातील अधिकारीच यात सामील असल्याने केवळ तक्रारी करून न्याय मिळणार नाही, त्यामुळे मी सर्व सबळ पुरावे घेऊन उच्च न्यायालयात जाणार असल्याचे जलील यांनी स्पष्ट केले. २०१० पासून वाटप करण्यात आलेल्या घरकुलांपैकी हजारो घरकुले प्रत्यक्ष जमिनीवर अस्तित्वातच नसल्याचा दावाही त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामुळे खऱ्या गरजूंना घरकुल मिळण्याऐवजी दलालांचे खिसे भरले जात असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटील“चेतन पाटील हे पत्रकार आहेत. त्यांना राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, मनोरंजन आणि क्रीडा अशा विविध बीटच्या बातम्या केल्याचा अनुभव आहे. चेतन पाटील यांनी दैनिक लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा विविध वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. चेतन हे जवळपास 8 वर्षांपेक्षा अधिकचा काळ माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी कल्याणच्या नामांकित बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी शिक्षण घेतलं आहे. त्यांना पदवीचं शिक्षण घेत असताना एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम करण्याचा अनुभव आहे. सध्या ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन येथे कार्यरत आहेत.

    चेतन पाटील यांनी केलेल्या बातमीमुळे एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली. याशिवाय चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडलेला बघायला मिळाला आहे.

    चेतन पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना त्यांच्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवीकट्टा सदरात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांनी नाटकातही काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य हौशी स्पर्धेत भाग घेतलाय. त्यांनी ‘जलरंग तापी’ नाट्य संस्थेसोबत काम करत असताना ‘नटसम्राट’ नाटकात बूटपॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका प्रचंड भाव खाऊन गेली होती. त्यांच्या अभिनयाने प्रभावित होऊन एका प्रेक्षकाने त्यांना खांद्यावर उचलून घेत नृत्य केलं होतं.

    खूप छोट्या गोष्टींमधून आनंद शोधावा, असं त्यांचं मत आहे. त्यांना पत्रकारितेसह वाचन, लेखनाची आवड आहे. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं वैयक्तिक आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.”… आणखी वाचा