• Sat. Sep 21st, 2024

डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक

डबलडेकर गुजरातकडे! फ्लाईंग राणीचे जुने डबे वडोदरा-वापी ट्रेनला जोडले, महाराष्ट्राच्या वाट्याला सिंगल डेक

म. टा. वृत्तसेवा, पालघर : पश्चिम रेल्वेने फ्लाईंग राणीचे डबल डेकरचे डबे जुने झाल्याचे सांगून त्याऐवजी नवीन डबे बसवले, मात्र जुने डबल डेकरचे गुजरात राज्यातील वडोदरा ते वापी या दरम्यान धावणाऱ्या ट्रेनला जोडून तेथील प्रवासी वाहून नेण्याचे क्षमता वाढवून दिली, मात्र महाराष्ट्रातील डहाणूपासून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची रेल्वेने चक्क फसवणूक केल्याचे समोर आले आहे. रेल्वे महाराष्ट्रातील प्रवाशांवर जाणीवपूर्वक अन्याय करत असल्याबाबत प्रवासी आणि नागरिकांतर्फे संताप व्यक्त करण्यात येत आहे

पश्चिम रेल्वेवर सुरतवरून पहाटे पाचच्या सुमारास मुंबईकडे येण्यासाठी जलद गती असलेली फ्लाईंग राणी एक्सप्रेस ही ट्रेन गेली ५० वर्षे प्रवाशांना सेवा देत आहे. मधू दंडवते रेल्वेमंत्री असताना त्यांच्या काळात साधे डबे जाऊन अधिक प्रवासी वाहून नेण्यासाठी डबल डेकरचे डबे जोडण्यात आले होते. सुरतपासून थेट पालघरपर्यंतचे प्रवासी या ट्रेनमधून प्रवास करत असत. परंतु, पश्चिम रेल्वेने या ट्रेनचे डबल डेकरचे डबे जुने झाले, असे सांगून त्याऐवजी नवीन साधे डबे लावले आहेत. त्यामुळे प्रवासी वाहून नेण्याची संख्या कमी झाली आहे.

पश्चिम रेल्वेने फ्लाईंग राणीचे जुने डबे चक्क गुजरातमध्ये वडोदरा-वलसाडदरम्यान धावणाऱ्या ०९१६१/६२ गाडीला जोडलेले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, फ्लाईंग राणीमधून सुरतपासून बलसाड, नवसारी, अमलसाड, वापी, संजाण, उंबरगाव, डहाणू, पालघर या स्टेशनांवरून प्रवासी व व्यापारी मोठ्या प्रमाणात प्रवास करत असतात. डबल डेकरच्या डब्यांमुळे आसनसंख्या जवळपास १५०च्या आसपास होती. आता जुने साधे सिंगल डेकर डबे बसवल्याने ही संख्या ७० ते ८० च्या दरम्यान झाली आहे त्यामुळे येथील प्रवाशांना फ्लाईंग राणीच्या डब्यांमध्ये बसण्यासाठी जागा तर मिळत नाहीच परंतु, उभेदेखील राहता येत नाही. त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होत आहे.
गुड न्यूज! गेटवे ते बेलापूर प्रवास आता १ तासात; डिसेंबरपासून ई-वॉटर टॅक्सी सुरु, किती असेल तिकीट दर?
लोकलसेवाही अपुरी

पश्चिम रेल्वेने चर्चगेट ते विरारदरम्यानच्या उपनगरीय विभागाला २५ वर्षांपूर्वी विरार ते डहाणू दरम्यान उपनगरीय विभाग म्हणून जाहीर केला. त्यानंतर तब्बल १६ वर्षांनी डहाणू ते विरार, बोरिवली, अंधेरी, दादर अशी लोकल सेवा सुरू केली. मात्र ही लोकलसेवा खूपच अपुरी असून ती वाढवण्याची सातत्याने मागणी करण्यात येत आहे. लोकलच्या फेऱ्या वाढून मिळाव्यात म्हणून परंतु त्याकडे पश्चिम रेल्वे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. इतकेच नव्हे तर करोनाच्या काळात ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या पालघर, डहाणू, बोईसर, सफाळा या रेल्वे स्थानकांदरम्यान थांबत होत्या, त्या बंद करण्यात आल्या असून पुन्हा सुरू झाल्याने ते प्रवाशांना खूपच अडचणीचे ठरत आहे. रेल्वे प्रशासन त्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. अशा स्थितीत डबल डेकरचे फ्लाईंग राणीचे डबे काढून बडोदरा वापी दरम्यान धावणाऱ्या ट्रेनना वापरण्यात येत असल्याने महाराष्ट्रातील प्रवाशांची पश्चिम रेल्वेने फसवणूक केल्याची भावना प्रवासी संघटना व नागरिकांमध्ये आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed