आगीची घटना तिरोडा तालुक्यातील ग्राम मेंदीपूर येथे सोमवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आगीत घरासह सर्वकाही जळून भस्मसात झाले असून लालचंद चचाने आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे फक्त अंगावर असलेले कपडेच उरले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, सोमवारी रात्री सुमारे ८:३० वाजच्या सुमारास तालुक्यातील ग्राम मेंदीपूर येथे लालचंद चचाने हे गावातील मंदिरात आरतीसाठी सहपरिवार गेले होते. या दरम्यान काही कारणाने त्यांच्या घरातून धूर निघत असल्याचे शेजऱ्यांना दिसून आले. शेजाऱ्यांनी याची माहिती तात्काळ चचाने परिवाराला दिली असता त्यांनी लगेच आपल्या घराकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावर गावातील तरुणांनी अग्निशमन विभागाला सुद्धा माहिती दिली आणि स्वतः आग विझविण्यासाठी भिडले.
अग्निशमन विभागाची दोन वाहनं घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लगेच आगीवर नियंत्रण मिळविले. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, चचाने यांचे कौलांचे घर असल्याने आतील पैसे, धान्य, फर्निचर व अन्य संपूर्ण गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले. विशेष म्हणजे गावातील तरुणांनी प्रसंगावधान राखून गॅस सिलिंडर आगीचं प्रमाण वाढण्यापूर्वी बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनास्थळी सरपंच, पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तमुंस सदस्यांनी धाव घेतली.
गावच्या तलाठ्यांनी घटनास्थळी तात्काळ जाऊन पंचनामा केला. शासनाने चचाने कुटुंबीयांना तात्काळ मदत व अर्थसाहाय्य करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
दरम्यान, आगीच्या घटनेवेळी गावातील तरुणांनी आणि युवकांनी प्रसंगावधान राखून मदत केल्यानं वेळीच गॅस सिलेंडर बाहेर काढल्यानं या आगीची तीव्रता वाढली नाही.