• Sat. Sep 21st, 2024

शंभूराज देसाईंनी बोलावली बैठक, त्यापूर्वीच उदयनराजे गटाचा विरोध, वादाची ठिणगी, नेमकं प्रकरण काय?

शंभूराज देसाईंनी बोलावली बैठक, त्यापूर्वीच उदयनराजे गटाचा विरोध, वादाची ठिणगी, नेमकं प्रकरण काय?

सातारा : साताऱ्यातील पोवई नाका येथे रयतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलाय. या पुतळ्याला नुकतीच ६३ वर्षे पूर्ण झाली. यानंतर हा संपूर्ण परिसर पवित्र तीर्थक्षेत्र मानला जाऊ लागला आहे. आता पुतळा परिसराला शिवतीर्थ नावाने ओळखलं जात आहे. असे असताना पोवई नाक्याचे नामांतर तसेच या परिसरात इतर कोणाच्या तरी नावाने आयलँड उभारण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप होत आहे. याबाबतची माहिती होताच शिवतीर्थ परिसरात कदापिही असले उद्योग खपवून घेणार नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया साताऱ्यात ऐकायला मिळत आहेत.

शिवतीर्थ परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावे चौक विकसित करून सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. याबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली १६ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात बोलावलेल्या बैठकीत आढावा घेतला जाणार आहे. संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बैठकी आधीच शिवतीर्थाच्या कामावरून तसेच पोवई नाक्यावरील चौकाला बाळासाहेब देसाईंचे नाव देण्यावरून उदयनराजे आणि शंभूराज देसाई या दोघांमध्ये नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

कट्टर समर्थकावर कोयत्याने हल्ला, उदयनराजे तडक रुग्णालयात, भेट घेत म्हणाले….
दरम्यान, आज राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी तातडीने शिवतीर्थावर धाव घेऊन पाहणी केली. त्यांच्यासमवेत माजी नगराध्यक्ष रंजना राऊत व इतर मान्यवर उपस्थित होते. शिवतीर्थावर कोणताही बदल, नामांतर किंवा कोणत्याही इतर महापुरुषांचे स्मारक उभारण्याला आमचा कडाडून विरोध असेल, अशी भूमिका असल्याचे माजी नगराध्यक्षा रंजना राऊत यांनी स्पष्ट केले आहे. सुशिक्षित बेरोजगार संघटनेचे प्रमुख महारुद्र तिकुंडे यांनीही तीव्र आंदोलन करून हे प्रकरण हाणून पाडू, असे स्पष्ट केले आहे. इतरही शिवप्रेमी संघटनांनी नाराजी व्यक्त करून आंदोलन करण्याची तयारी दाखवली आहे.

एकुलत्या एका लेकाला देशसेवेसाठी धाडलं, सातारच्या अजिंक्यने लेफ्टनंट पद कमावलं, जिल्ह्याचं नाव उंचावलं

गेल्या तीन महिन्यांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले यांच्या वॉलपेंटींगवरूनही शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाजवळच हे वॉल पेंटिंग काढल्याने वाद उफाळून आला होता. यावेळी उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले होते. हा वाद जिल्हा पोलीस अधीक्षकांपर्यंत पोहोचला होता. त्यांनी सुवर्णमध्य साधून हा वाद मिटवला होता. उदयनराजेंचे पेंटिंगही पूर्ण झालं होतं. मात्र, आता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवतीर्थाच्या नामांतरण व सुशोभीकरण आढावा बैठक आयोजित केल्याच्या कारणावरून खासदार उदयनराजे भोसले व पालकमंत्री शंभूराज देसाई आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या बैठकीला उदयनराजे समर्थकांकडून कडाडून विरोध होत आहे. हा प्रतिष्ठेचा विषय बनल्याने शहरातील वातावरण ढवळून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed