• Sun. Mar 15th, 2026

    दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

    दळणाचा डब्बा घेऊन जात होती, घराजवळ येताच बिबट्याने झडप घातली, ७ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

    नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात असलेल्या पिंपळद येथे बिबट्याच्या हल्ल्यात सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची ही चौथी घटना घडली आहे. अंकिता भाऊसाहेब सकाळे (वय ७ वर्ष, रा. सकाळे मळा, पिंपळद) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.ही मुलगी आपल्या मोठ्या बहिणीसोबत पाच वाजेच्या सुमारास पिंपळद गावातून आपल्या घरी दळणाचा डब्बा घेऊन जात होती. घराजवळच काही अंतरावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक झडप घातली. यावेळी काही ग्रामस्थांनी बिबट्याची झडप पाहताच त्या दिशेने धाव घेतली. मात्र बिबट्याने उसाच्या शेतात धूम ठोकली. या हल्ल्यात अंकिताला मानेवर गंभीर जखमा झाल्या. तिथे जमलेल्या ग्रामस्थांनी अंकिताला तात्काळ त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.

    Nashik : अल्पवयीन मुलीशी मैत्री, आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी अन् लैंगिक अत्याचार
    दरम्यान, बिबट्याच्या हल्ल्यात अंकिताच्या मानेवर, कपाळावर, डाव्या हातावर, पोटावर, बेंबीजवळ अशा ठिकाणी बिबट्याच्या दाताच्या व नखांच्या जखमा आढळून आल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात अंकिताचा मृत्यू झाल्याने सकाळे कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलीचा मृतदेह त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयामार्फत नाशिक जिल्हा रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची ही चौथी घटना आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

    तालुक्यातील धुमोडी, वेळूंजे, ब्राह्मणवाडे या ठिकाणी बिबट्याच्या हल्ल्यात आधीच काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांनतर आता पिंपळद येथे ही घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पूर्व विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी यावेळी वन विभागाच्या पथकाला घेराव घातला. वेळोवेळी मागणी करूनही वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचा जाब गावकऱ्यांनी विचारला. यानंतर वन विभागाने तातडीने उपाययोजना करत पाच पिंजरे मागवत बिबट्यांचा वावर असलेल्या ठिकाणी ते बसवले आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed