• Thu. Mar 19th, 2026
    School Timing Change: आता शाळा भरणार सकाळी; वाढत्या उन्हामुळे निर्णय, सोमवारपासून 2090 शाळांचे वेळापत्रक बदलणार

    School Timing Change: उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहराचे तापमान ३९.८ अंश सेल्सिअसवर पोहचले. वाढते तापमान लक्षात घेत, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळांच्या वेळांमध्ये एकदा बदल करण्यात आला आहे.

    शाळेच्या वेळांत बदल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात आला आहे. सोमवारपासून (१६ मार्च) जिल्हा परिषदेच्या शाळा सकाळी सात ते दुपारी साडेबारा सत्रात भरिवण्यात येणार आहे. तर दोन सत्र पद्धतीने भरणाऱ्या शाळांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

    शिक्षणाधिकारी कार्यालयाने पत्राद्वारे शनिवारी जाहीर केले. शाळांची वेळ सकाळी सात ते दुपारी साडेबारा अशी राहणार आहे. याबाबत शिक्षण विभागाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे, जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत १६ मार्चपासून शैक्षणिक वर्षाअखेर एक सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सकाळी ७ ते १२.३० पर्यंत राहील.

    Maharashtra TimesCrime News : मुलगी नको, घरातच गर्भपाताचं रॅकेट, पोटच्या गोळ्याला पोटातच संपवलं, छ.संभाजीनगरमधील घटना उघड
    शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जयश्री चव्हाण आणि शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अश्विनी लाठकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. हे आदेश जिल्हा परिषद शाळांपुरते असतील, खासगी माध्यमांच्या आणि इतर व्यवस्थापनांच्या शाळांना हे लागू असणार नाही, त्याचे व्यवस्थापन याबाबत निर्णय घेऊ शकते, असे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

    मधली सुट्टी ३० मिनिटांची
    शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, एक सत्रात भरणाऱ्या शाळांची वेळ सात ते साडेपर्यंत राहील. शाळांची मधली सुट्टी ३० मिनिटांची असणार आहे. दोन सत्र पद्धतीने भरणाऱ्या शाळांच्या वेळेत कोणताही बदल होणार नाही. अध्यापनाच्या तासांत कोणताही बदल होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अध्यापनाचे वेळापत्रक गटशिक्षणाधिकारी यांनी निश्चित करावी आणि त्याप्रमाणे शालेय कामकाज होईल, याची क्षेत्रीय अधिकारी यांची मार्फत खात्री करावी, शैक्षणिक वर्षामध्ये कामाचे किमान दिवस, शिक्षणाचे तास व शिक्षकांसाठी प्रत्येक आठवड्याला किमान तास निश्चित करणे, यासाठी निर्देश तत्त्वाचे उल्लंघन होणार नाही, याची खात्री करावी. शाळेची वेळ कमी होत असल्याने या कालावधीत सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ शाळा राहील.

    Maharashtra TimesChhatrapati Sambhajinagar: आणखी दोन ऑटो गॅस सेंटरवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड; सेव्हन हिल गॅस सेंटरमधूनही गॅस विक्री बंद
    २०९० —जिल्हा परिषद शाळांची संख्या
    २,२०,००० —एकूण प्रवेशित विद्यार्थी संख्या

    अनेक शाळांवर पत्रे

    जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी १० ते ४ वाजेपर्यंतची आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक २०९० तर ५५ पेक्षा अधिक माध्यमिक शाळा आहेत. दोन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता या शाळा सकाळी ७ वाजता शाळा सुरू होणार आहेत. यंदा फेब्रुवारीअखेरपासूनच उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरूवात झाली. मार्च महिन्यात उन्हाचा आणखी वाढला. जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांवर पत्रे आहेत. अशावेळी उन्हाळ्यात ही पत्रे तापतात. शिवाय ग्रामीण भागात वीजपुरवठाही अनेकदा सुरळीत नसतो. विद्यार्थी, शिक्षकांना उन्हाचा त्रास अधिक जाणवू शकतो. त्यामुळे सत्रात बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा