• Fri. Sep 11th, 2026

Navi Mumbai Woman Death : प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने आपले रंग दाखवले. त्यानंतर रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पत्नीचा अकाली अंत झाल्याची घटना नवी मुंबईतील घणसोली परिसरात उघडकीस आली आहे

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, नवी मुंबई : प्रेमविवाहानंतर अवघ्या चार दिवसांत पतीने नवविवाहित पत्नीला केलेल्या कथित जीवघेण्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील घणसोली परिसरात हा अंगावर काटा आणणारा प्रकार घडला. सायली लोखंडे असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी रबाळे पोलिसांनी पती सागर कदम याला अटक केली आहे. सागरने केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सायलीने उपचारादरम्यान रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पळून जाऊन प्रेम विवाह

नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या सायली लोखंडे हिचे त्याच परिसरात राहणाऱ्या सागर कदम याच्यासोबत प्रेमसंबंध होते. ५ जून रोजी सायली नेहमीप्रमाणे कामावर जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र, त्यानंतर ती सागरसोबत निघून गेल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. दोघांनी लग्न केल्याचेही समोर आले. मात्र, लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत सायली रुग्णालयात दाखल असल्याची माहिती तिच्या कुटुंबीयांना मिळाली.

पतीविरोधात पोलिसात गुन्हा

सायलीला झालेल्या गंभीर दुखापतींची माहिती मिळाल्यानंतर कुटुंबीयांनी सागर कदम याच्याविरोधात मारहाणीची तक्रार रबाळे पोलिसांकडे दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. मात्र, सायलीची प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्बल दोन महिने ती मृत्यूशी झुंज देत होती.

Maharashtra TimesSatara Crime : बाथरुमच्या भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर, रेक्टरचे बेछूट आरोप, साताऱ्यात सृष्टीने आयुष्य संपवलं, पोलिसांनी कारवाईचा फास आवळला

प्रेमसंबंधातून लग्न, चारच दिवसात उद्ध्वस्त

अखेर उपचारादरम्यान सायलीचा मृत्यू झाला. त्यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात हत्येचे कलम वाढवून आरोपी सागर कदम याला अटक केली. प्रेमसंबंधातून सुरू झालेला संसार लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत उद्ध्वस्त झाला आणि त्यानंतर तब्बल दोन महिने मृत्यूशी झुंज देऊन सायलीचा अखेर मृत्यू झाला.

Maharashtra TimesAnurag Upadhyay : कॉर्पोरेटची संधी सोडून लष्करात, कर्नल अनुराग उपाध्याय स्ट्रोकनंतर मदतीच्या प्रतिक्षेत, मज्जासंस्थेवर मोठा आघात

मैत्रिणीशी बोलल्याचं निमित्त

फक्त मैत्रिणीचा फोन आला म्हणून नवऱ्यानं जबर मारहाण केली. लाथाबुक्क्यांनी डोळ्यावर, पोटावर, तोंडावर मारहाण केली असल्याचे सायलीने तक्रारीत नमूद केल्याची माहिती आहे. मारहाणीमुळे सायलीच्या पोटातील नाजूक अवयवांना गंभीर इजा झाली. सायलीची प्रकृती आधिकच खालवल्याने तिला चेंबूर येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्रा तीन महिन्यांच्या उपचाराअंती तिचा श्वास थांबला. या घटनेने घणसोली परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, रबाळे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.