Maharashtra Weather: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा महाराष्ट्रावर सकारात्मक परिणाम होतो आहे. जुलैअखेरीस राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ३० जुलै रोजी कोण-कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे?
कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
प्रादेशिक हवामान विभागाने मुंबईमध्ये शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल, असा अंदाज वर्तवला आहे. पालघरला शुक्रवारसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला. रायगडमध्ये गुरुवारी आणि शुक्रवारी दोन्ही दिवसांसाठी ‘ऑरेंज ॲलर्ट’ असून गुरुवारी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस मेघगर्जनेसह उपस्थिती लावू शकेल, तर शुक्रवारी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधील पावसाचा जोरही गुरुवारपासून वाढू शकतो. या दोन्ही जिल्ह्यांना ‘यलो ॲलर्ट’ आहे.
Gadchiroli Rain: गडचिरोलीला पुराचा वेढा! सिरोंचा तालुक्यात मुसळधार पाऊस, 15 गावांचा संपर्क तुटला
पावसाने मोडला ११७ वर्षांचा विक्रम
पुण्यात यंदा जुलै महिन्यात पडलेल्या पावसाने सन १९०७ च्या जुलैमध्ये झालेल्या ५०८.५ मिलिमीटर पावसाचा विक्रम मोडला आहे. शहरात एक ते २९ जुलै दरम्यान ५०८.९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावरही विक्रमी पाऊस पडला आहे. पुढील दोन दिवस शहरात आकाश मुख्यत: ढगाळ राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. घाट माथ्यावर जोरदार; तर काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) व्यक्त केला आहे.
पुणे शहरात एक जून ते २९ जुलै या कालावधीत ५७२.९ मिमी पावसाची नोंद झाली.पुण्यात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली, दिवसभर आकाश ढगाळ होते, उकाडाही वाढला होता, केवळ दुपारी काही भागांत हलक्या सरी पडल्या. रात्री हवेत गारवा जाणवला. दोन दिवसांच्या तुलनेत शहरात तापमानात वाढ नोंदविण्यात आली. बुधवारी दिवसभरात २८.२ कमाल आणि २२.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. जिल्हा आणि घाटमाथ्यावर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला.
पश्चिम महाराष्ट्रात हवामान कसं असेल?
पश्चिम महाराष्ट्रात हवामानाची स्थिती संमिश्र राहील. पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील घाट माथ्याच्या परिसरात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, या जिल्ह्यांचे मैदानी भाग तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील; सांगली व सोलापूरसाठी कोणताही इशारा नाही.
उत्तर महाराष्ट्रात मुसळधार सरींचा इशारा
उत्तर महाराष्ट्रात गुरुवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्हा आणि नाशिकच्या घाट परिसरात प्रादेशिक हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगरमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांत या भागांमद्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस होऊ शकतो.
मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कसं असेल?
३० जुलै रोजी मराठवाड्याती बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील. जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये येत्या दोन दिवसांत धो-धो पाऊस बरसेल. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. तर बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
