Ganesh Arrival 2026:अखेर गणपची बाप्पांच्या आगमनाचा दिवस आलाच. गणपती बाप्पा मोरया म्हणत संपूर्ण जिल्हा भक्तिमय झालेला आहे.
गणेशोत्सवाच्या जल्लोषाला सुरूवात
घराघरांतही बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी लगबग सुरू आहे. सजलेले मंडप, फुलांनी नटलेली घरे, पूजेच्या साहित्याने गजबजलेल्या बाजारपेठा आणि आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी उत्साहाने धावणारे भाविक… या साऱ्यांनी ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात रविवारी रात्रीपासून गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला आहे.
बाप्पाच्या स्वागताचा उत्साह कायम
आज जिल्ह्यातील घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर परिसर गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारून गेला आहे. पारंपरिक वेशभूषेत कुटुंबासह गणपती कारखान्यांकडे जाणारे भाविक, टाळ-मृदंगाच्या गजरात मूर्ती घेऊन परतणारे भक्त आणि मखर, फुले-पत्री, पूजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी, असे उत्सवी चित्र सर्वत्र दिसत आहे. या गर्दीमुळे काही भागांत वाहतूक कोंडी होत असली, तरी बाप्पाच्या स्वागताचा उत्साह मात्र कायम आहे.
१ लाख ६६ हजार ५२४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत यंदा तब्बल १ लाख ६६ हजार ५२४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. यामध्ये १ हजार ७६ सार्वजनिक, तर १ लाख ६५ हजार ४४८ खासगी गणपतींचा समावेश आहे. सर्वाधिक गणेशमूर्तीकल्याण परिमंडळात असून, त्यानंतर उल्हासनगर, वागळे इस्टेट, भिवंडी आणि ठाणे परिमंडळाचा क्रमांक आहे.
ठाणे पोलिस हद्दीत १९३ विसर्जनस्थळे
गणरायाच्या आगमनाबरोबरच विसर्जनाचीही तयारी सुरू झाली आहे. ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत एकूण १९३ विसर्जनस्थळे असून, कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात १३३ कृत्रिम तलाव उभारण्याचे काम सुरू आहे. दुर्गाडी गणेश घाटआणि डोंबिवलीतील मोठागाव गणेश घाटावर मोठ्या प्रमाणावर मूर्तींचे विसर्जन होत असल्याने तेथेही नियोजन करण्यात येत आहे.
महापालिका आणि पोलिस यंत्रणा सज्ज
पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तीन हजार ३००हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असून, एक हजार होमगार्ड जवानांची मदत घेतली जाणार आहे. एसआरपीएफच्या कंपन्याही बंदोबस्तासाठी असणार आहेत. कल्याण-डोंबिवली परिसरात पोलिसांनी रूट मार्च काढून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.
FDA Ganeshotsav Rules: महाप्रसाद वाटा, स्वच्छतेचे निकष पाळा! गणेश मंडळांना ‘एफडीए’च्या मार्गदर्शक सूचना
पावसामुळे तारांबळ
शनिवारी मध्यरात्रीपासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे ठाणे परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आणि गणेशभक्तांची काहीशी तारांबळ उडाली. मात्र, पावसाच्या सरी आणि साचलेल्या पाण्याची पर्वा न करता बाप्पाच्या आगमनाचा उत्साह कायम होता.
