जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये, १८ जुलैपर्यंत राज्यात पावसाची एकूण १४ टक्के तूट नोंदली गेली आहे. कोकण आणि गोवा विभागात तसेच मध्य महाराष्ट्रात पाऊस सरासरीच्या श्रेणीत असला, तरी मराठवाडा आणि विदर्भामध्ये पावसाची ३० टक्क्यांहून अधिक तूट आहे. कोकण विभागातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची स्थिती चांगली नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये केवळ सात टक्के अतिरिक्त पाऊस आहे, तर सिंधुदुर्गात ३६ टक्के तूट आहे. राज्यात सर्वाधिक, ५८ टक्के तूट गडचिरोली जिल्ह्यात आहे. विदर्भामध्ये एकंदरच पाऊस कमी असताना ही मोठी तूट चिंतेचे कारण ठरली आहे. त्यामुळे येत्या आठवड्यातील पाऊस पुन्हा एकदा राज्यासाठी महत्त्वाचा आहे.
Kandivali Railway Terminus: मुंबईतील सर्वात मोठं रेल्वे टर्मिनस उभारण्याची तयारी, कांदिवलीमध्ये जमीन निश्चित; प्रकल्पासमोर एक अडथळा
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पालघर जिल्ह्यात बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल. तर रायगड जिल्ह्यात मंगळवारी आणि बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरीतही बुधवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकण विभागात सक्रिय झालेला पाऊस मंगळवार आणि बुधवारी घाट परिसरातही जोरदार पडू शकतो. पुणे आणि नाशिक घाट परिसरात या दोन्ही दिवशी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात बुधवारपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज आहे.
शेजारी ओलावा, विदर्भ तहानलेला
विदर्भात १९ ते २० जुलैदरम्यान बहुतांश जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांत काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, काही भागांत ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही इशारा देण्यात आला आहे. अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलढाणा आणि काही भागांत तुलनेने कमी पावसाची शक्यता आहे.
देशभरात यंदा मान्सूनची कामगिरी अनेक ठिकाणी असमाधानकारक राहिली आहे. सर्वच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. देशाच्या सर्व भागांपैकी केवळ मध्य भारतातच आतापर्यंत चार टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. मात्र, त्याच मध्य भारताचा भाग असलेल्या विदर्भात तब्बल २७ टक्क्यांची तूट नोंदविण्यात आली आहे. केंद्रीय व प्रादेशिक हवामान विभागाच्या आकडेवारीतून हे स्पष्ट झाले आहे.
देशभरात या कालावधीत पावसाची १५ टक्के तूट असून पूर्व व ईशान्य भारतात ती सर्वाधिक ३९ टक्के आहे. तर उत्तर-पश्चिम भारतात १५ टक्के आणि दक्षिण द्वीपकल्पात १४ टक्के तूट नोंदविण्यात आली आहे. याउलट मध्य भारतात सरासरीच्या चार टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भात मात्र गोंदिया जिल्हा हा अपवाद ठरला असून येथे सरासरीपेक्षा १६ टक्के अधिक पाऊस झाला आहे. उर्वरित सर्व जिल्ह्यांत तूट कायम आहे. गडचिरोलीत सर्वाधिक ५३ टक्के, भंडारा ४१ टक्के, वाशीम ३५ टक्के, चंद्रपूर ३४ टक्के, अमरावती २४ टक्के, नागपूर व अकोला प्रत्येकी २१ टक्के, यवतमाळ १९ टक्के, वर्धा १३ टक्के आणि बुलडाणा येथे ८ टक्के कमी पाऊस झाला आहे. बंगालच्या उपसागरात अपेक्षित कमी दाबाच्या क्षेत्रांची निर्मिती कमी झाल्यामुळे पूर्व, ईशान्य भारत तसेच विदर्भातील पावसावर परिणाम झाल्याचे हवामान तज्ज्ञांचे मत आहे.
आज १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, अहिल्यानगर, परभणी, बीड, हिंगोली, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे.
यंदा जुलै महिन्यात सरासरीहून कमी पाऊस नोंदला गेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.
