• Wed. Jun 17th, 2026
    Satara News: मुलीच्या लग्नाची स्वप्नं उरी, पण नियतीचा क्रूर खेळ; निर्माल्य टाकताना कृष्णा नदीत बुडून आईचा मृत्यू

    सुधीर पाटील, सातारा : मंदिरातील पुजेचे निर्माल्य कृष्णा नदी पात्रात टाकण्यासाठी गेल्यानंतर पाय घसरून पाण्यात पडल्याने ४३ वर्षीय महिलेचा बुडून मृत्यू झाला. कराड तालुक्यातील बेलवडे हवेली गावातील कृष्णा नदीपात्रात शुक्रवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. नदीकाठावर आढळलेल्या चपलांवरून या घटनेचा उलगडा झाला. वैशाली भगवान गुरव, असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांच्या मृत्युने दोन मुले आईच्या मायेला पोरकी झाली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेलवडे हवेली गावातील मंदिरात संकष्टी चतुर्थी निमित्त पूजा होती. पुजेवेळी भाविकांनी वाहिलेली, फुले, दुर्वा कृष्णा नदी पात्रात सोडण्यासाठी वैशाली गुरव सायंकाळी ५ वाजता गेल्या होत्या. जाताना त्यांनी आपल्या पतीला सांगितले होते. त्यानंतर पती भगवान गुरव हे उंब्रजला गेले. घरी आल्यानंतर त्यांना पत्नी अजून घरी आली नसल्याचे समजले.

    भगवान गुरव हे तातडीने ग्रामपंचायत कार्यालयाकडे गेले. त्याठिकाणी बोलत उभे राहिलेल्या संग्राम पवार, सुभाष पवार, दत्तात्रय पवार, अक्षय जाधव यांना त्यांनी संपुर्ण घटना सांगितली. सर्वजण कृष्णा नदी पात्राच्या जुन्या पाणवठ्यावर गेले. त्यावेळी नदी पात्राकडेला महिलेच्या पायातील चप्पलचा जोड आढळून आला. तो आपल्या पत्नीचा असल्याचे भगवान गुरव यांनी ओळखले.

    Raigad Fort : शिवजयंतीलाच रायगडाची अशी अवस्था, शिवरायांच्या समाधीजवळील तुटलेले बॅरिकेट्स कापडी चिंध्यांनी बांधले; प्रशासनावर टीकेची झोड

    काहीतरी विपरीत घडल्याचा अंदाज आल्याने सर्वजण नदीपात्रात उतरले. संग्राम पवार व बाळासाहेब दत्तात्रय पवार यांना पाण्यात एक महिलेचा मृतदेह तरंगताना दिसला. एकमेकांच्या मदतीने त्यांनी मृतदेह नदी पात्रातून बाहेर काढला. तो मृतदेह आपल्या पत्नीचाच असल्याची खात्री भगवान गुरव यांना पटली. याबाबत पोलीस पाटील अक्षय तानाजी जाधव यांनी तळबीड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.

    मृत वैशाली गुरव यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी उपवर आणि मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. मुलीच्या डोक्यावर अक्षता पडताना पाहण्याचे भाग्य माऊलीला लाभले नाही.

    Maharashtra TimesLatur News : धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…

    कुटुंबाला सुखाचे दिवस आले असताना काळाने त्यांना कुटुंबातून हिरावून नेले. या दुर्दैवी घटनेने बेलवडे हवेली गावावर शोककळा पसरली आहे. तळबीड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed