• Sun. Mar 8th, 2026
    Latur News : धडक एवढी भयंकर की उभा आयशर टेम्पो पलटी झाला; भरधाव BMW तील चौघे जागीच गेले, दोन गंभीर, कारचा अक्षरशः चुराडा झाला…

    लातूरमधील औसा-तुळजापूर महामार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा जागीच मृत्यू, २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

    औसा-तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    ऋषिकेश होळीकर, लातूर: औसा-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी रात्री झालेल्या एका अत्यंत भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू (BMW) कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला जोरदार धडक दिल्याने हा थरार घडला. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी आहेत. मृतांमध्ये औसा तालुक्यातील तिघांचा तर सांगलीतील एकाचा समावेश आहे.

    नेमकी घटना काय?

    मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. बीएमडब्ल्यू कार (क्रमांक एम.एच. ०४ ई.जी. ७५००) शिवली येथून जेवण करून परतत होती. औसा शहराजवळील हॉटेल साईप्रसादसमोर लाकूड वाहतूक करणारा आयशर टेम्पो (क्रमांक एम.एच. २५ यू. ०५२२) रस्त्याच्या कडेला उभा होता. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट या टेम्पोला मागच्या बाजूने जाऊन धडकली.ही धडक इतकी भीषण होती की, आयशर टेम्पो पलटी झाला आणि बीएमडब्ल्यू कारचा छप्पर (टप) पूर्णपणे उडून गेला. या अपघातात कारमधील सहा प्रवाशांपैकी चौघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    Maharashtra TimesRaigad Accident : नुकताच जुळ्या बाळांचा बाप झाला, स्टेटस ठेवलं, घरी जाऊन आनंद साजरा करण्याआधीच वनरक्षक पित्याचा दुर्दैवी अंत; रायगडमध्ये हळहळ

    मृतांची ओळख

    १. आबासाहेब आप्पासाहेब साळुंके (वय ३६), २. शुभम शेषराव पाटील (वय २६), ३. किसन रामलिंग साळुंखे (वय ४८, सर्व रा. बोरगाव (न.), ता. औसा), ४. धनराज काशिनाथ जाधव (वय ४६, रा. सांगली)

    जखमींवर उपचार सुरू

    या अपघातात जयहिंद विश्वास जाधव (रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हलदर (रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच औसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने औसा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने जयहिंद जाधव यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.

    Maharashtra TimesSupriya Sule: अजितदादांचं स्वप्न, फडणवीसांची अर्थसंकल्पात घोषणा; पण निधी कुठे? नीरा-कऱ्हा प्रकल्पावर सुप्रिया सुळे यांचा सवाल

    भरधाव वेगामुळे झालेल्या या अपघाताने संपूर्ण औसा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी आयशर टेम्पो आणि अपघातग्रस्त कार जप्त केली असून, पुढील तपास सुरू आहे. महामार्गावर असुरक्षितरीत्या थांबवलेली वाहने आणि बेशिस्त वेग, या दोन कारणांमुळे पुन्हा एकदा अपघातांचा प्रश्न गंभीर झाला आहे.

    सुनिल लाटे

    लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे, हे एक पत्रकार आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथून बी.ए व एम.ए. पत्रकारितेचं पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. कॉलेज जीवनातच ‘दैनिक दिव्य मराठी’मध्ये पत्रकारितेचं प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतलं आहे. दोन वर्षे ‘लोकसत्ता डॉट कॉम’साठी ‘फोटोगॅलरी व वेबस्टोरी’ या विभागात काम केलं आहे. ते ६ ऑक्टोबर २०२५ पासून ‘महाराष्ट्र टाईम्स’ ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. राजकारण, मनोरंजन, क्रीडा या विषयांच्या लिखाणात आवड आहे. याशिवाय काव्य लेखन, गीत लेखन आणि सादरीकरणातही स्वारस्य आहे. फोटोग्राफी, फोटो, व्हिडिओ संपादनातही खास रस आहे… आणखी वाचा