• Tue. Jun 23rd, 2026

    कोल्हापुरातील DYSP च्या गाडीला कर्नाटकात भीषण अपघात; आईसह दोघांचा मृत्यू

    ByMH LIVE NEWS

    Jan 12, 2026
    कोल्हापुरातील  DYSP च्या गाडीला कर्नाटकात भीषण अपघात; आईसह दोघांचा मृत्यू

    कोल्हापूर

    कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) उपपोलिस अधीक्षक (DYSP) वैष्णवी पाटील यांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या 65 वर्षीय आई कमला हरीबाबू पाटील आणि 40 वर्षीय चालक राकेश यांचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी पाटील व इतर दोघांना गंभीर दुखापत झाल्या आहेत.

    अपघाताची घटना कशी घडली?

    चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. तामिळनाडूतील प्रवास संपवून बंगलोरहून कोल्हापूरकडे परतत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे वैष्णवी यांच्या कारचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने वैष्णवी पाटील यांना वेळीच स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. चित्रदुर्ग जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वाखालील तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण तपासातून उलगडणार आहे.

    कर्तव्यनिष्ठ अधिकारी अन् हळहळ

    कोल्हापूर अँटी करप्शनमध्ये कार्यरत असलेल्या वैष्णवी पाटील या दक्ष व निष्ठावान अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी लाचलुचपतविरोधी मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावली असून, स्थानिक पातळीवर भ्रष्टाचाराच्या जाळ्यात अनेक मोठे मासे पकडले आहेत. रजा काढून कुटुंबासोबत प्रवासाला निघालेल्या वैष्णवी यांच्या आई कमला पाटील या गृहिणी होत्या, तर चालक राकेश हे अनुभवी ड्रायव्हर होते. अपघातानंतर वैष्णवी यांचे कुटुंबीय आणि कोल्हापूर पोलीस अधिकारी यांनी चित्रदुर्ग येथे धाव घेतली.

    तपासाअंती स्पष्ट होणार अपघाताचे कारण

    अपघातग्रस्त तिघांना चित्रदुर्ग जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. कोल्हापूर लाच लुचपत कार्यालयात शोककळा पसरली असून, महाराष्ट्र पोलीस दलाने त्यांच्या कुटुंबाला पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले आहे. चित्रदुर्ग ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालचंद्र नायक यांच्या नेतृत्वात तपास अधिक गती घेणार आहे.दरम्यान या घटनेने कोल्हापूर आणि चित्रदुर्ग पोलीस वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीसाठी सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी जोर धरली आहे, जेणेकरून अशा दुर्घटना टाळता येतील.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed