नाशिक
नाशिकच्या घोटी परिसरात कथित ४०० कोटी रुपयांच्या जुन्या चलनी नोटा घेऊन जाणारा कंटेनर लुटल्याच्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत आतापर्यंत ५ संशयितांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये गुजरातचा संशयित विराट गांधी याचाही समावेश असून, न्यायालयाने त्याला २८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
घोटी येथील संदीप पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जुन्या चलनी नोटा असलेल्या कथित ४०० कोटी रुपयांच्या कंटेनरच्या लुटीवरून त्यांना मुंबईतील काही बांधकाम व्यावसायिकांकडून धमकावण्यात येत होते. ९ जानेवारी २०२६ रोजी संशयित आरोपी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्दन गायगुडे यांनी संदीप पाटील यांचे फॉर्च्युनर कारमधून अपहरण केले. पिस्तुलचा धाक दाखवत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यानंतर त्यांना मुंबई-आग्रा महामार्गावर धावत्या गाडीतून बाहेर ढकलून दिले.
SIT मार्फत तपास सुरू
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले. अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तपास करत आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांच्या मुसक्या आवळल्या असून मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
“आतापर्यंत आम्ही पाच आरोपींना अटक केली आहे. विराट गांधी याला २८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून SIT मार्फत सखोल चौकशी सुरू आहे. लवकरच या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही तपास पूर्ण करू.” — आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.
४०० कोटींचा आकडा आणि संशय
दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात जुन्या चलनी नोटा कुठून आल्या आणि हा कंटेनर कोणाचा होता? याबाबत अद्याप गूढ कायम आहे. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्या मार्गदर्शनाखाली पथक या कथित नोटांच्या स्त्रोताचाही शोध घेत आहे.