• Thu. Jun 25th, 2026

    मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यानंतर ४८ तासांत संपूर्ण राज्यात मान्सून धडकणार; कुठे ‘यलो’? कुठे ‘ऑरेंज अलर्ट’?

    मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यानंतर ४८ तासांत संपूर्ण राज्यात मान्सून धडकणार; कुठे ‘यलो’? कुठे ‘ऑरेंज अलर्ट’?

    Monsoon Update: पुण्यात मोसमी वारे दाखल झाले असून मुंबईत मंगळावरी सकाळपासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. येत्या ४८ तासांमध्ये राज्यात सर्वत्र मान्सून दाखल होणार असून अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण राज्यातील मंगळवारचं हवामान कसं असेल?

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा.प्रतिनिधी, पुणे/ नाशिक: यावर्षी चार जूनला मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, गोवा आणि महाराष्ट्राच्या काही भागांत त्याने प्रगती केली. मात्र, अरबी समुद्रातील कमकुवत वारे आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील पुढील वाटचाल दोन आठवड्यांपासून ठप्प होती. रविवारी वातावरणातील अनुकूल बदलांमुळे मान्सूनचा प्रवास पुन्हा सुरू झाला. सोमवारी कोकणातील अलिबागपर्यंत आणि मध्य महाराष्ट्रात पुण्यापर्यंतचा भाग; शिवाय अलिबाग, निझामाबाद, दंतेवाडा, गया, मुझफ्फरपूर भागही मान्सूनने व्यापला. पुढील ४८ तासांत मुंबईसह राज्याच्या आणखी भागांत तो दाखल होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.

    मुंबईत मंगळवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढत चालला आहे. हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरांमध्ये मंगळवारसाठी ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. नवी मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये दिवसभर विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दिवसभर वादळी वाऱ्यांमुळे पावसाचा वेग वाढण्याचा अंदाज आहे.

    ४८ तास हवामान कसं असेल?

    नैर्ऋत्य मोसमी पाऊस सोमवारी पुण्यात दाखल झाल्याचे सोमवारी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. वातावरणातील अनुकूल घडामोडींमुळे सक्रिय झालेल्या मान्सूनचे वारे पुण्यापर्यंत पोहोचले असले, तरी शहरात दिवसभरात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची आनंदाची बातमी मिळूनही पुणेकरांचा हिरमोड झाला. पुढील दोन दिवस दुपारनंतर आकाश मुख्यतः ढगाळ राहणार असून, संध्याकाळी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ‘आएमडी’ने व्यक्त केली आहे.

    शहर आणि परिसरात, जिल्ह्यातही अनेक ठिकाणी रविवारी संध्याकाळी पावसाच्या सरी बरसल्या होत्या. त्यामुळे हवेत गारवा आला होता. २१ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पाऊस पडल्याने पुणेकरही सुखावले होते. सोमवारीदेखील शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. हवेत आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने उकाडाही वाढला होता. आजही संध्याकाळी पाऊस पडणार, अशी नागरिकांना अपेक्षा होती. सायंकाळी सहाच्या सुमारास वाराही सुटला होता; पण शहरात सरी बरसल्या नाहीत. जिल्ह्याच्या काही भागांत पावसाने हजेरी लावली. शिरूर तालुक्यात दुपारी जोरदार पाऊस पडला. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत कमाल आणि तापमानात मात्र घट नोंदविण्यात आली. दिवसभरात कमाल ३२ आणि किमान २३.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असल्याने पुढील चार दिवसांत राज्याचा अजून काही भाग मान्सून व्यापणार आहे. पुणे जिल्ह्यातही पावसाला अनुकूल वातावरण असल्याचे आयएमडीने सांगितले.

    नाशिक जिल्ह्यात वरुणराजाचे आगमन

    गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्ह्यातील बहुतांष भागात सोमवारी (दि. २२) पावसाने हजेरी लावली. त्र्यंबकेश्वरमध्ये मुसळधार पाऊस झाला, तर सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांमध्ये समाधानकारक पावसाने हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिला असला, तरी तालुक्यातील बहुतांश भाग अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मालेगाव, चांदवड, येवल्यासह बागलाणच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली.

    विदर्भातील हवामान कसं असेल ?

    विदर्भात सध्या राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. सोमवारी विदर्भातील कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. राज्यातील सर्वात उष्ण भागांपैकी एक हा आहे.

    कोणत्या जिल्ह्यांमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’?

    छत्रपती संभाजीनगरमध्ये सोमवारी जोरदार पावसामुळे नदीला अक्षरशः पूर आला होता. राज्यात सर्वत्र पावसाची दमदार बॅटिंग सुरू असून बुलढाणा, वाशिम, हिंगोली जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावली. आज दिवसभर अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामुळे यवतमाळ, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

    मान्सून तूट भरणार का?

    पुण्यात मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होते आणि एक ते २२ जून या कालावधीत सरासरी १०८ मिलिमीटर पावसाची नोंद होते. यंदा मे महिन्यात वळवाचा पाऊस कमी पडला. जूनमध्ये एकही दिवस पाऊस पडला नव्हता. रविवारी (२२ जून) या हंगामातील पहिल्या पावसाची नोंद झाली. दिवसभरात १८ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला. पुढील आठ दिवसांत मान्सून महिनाभराची ही मोठी तूट भरून काढणार का, याची नागरिकांसह प्रशासनालाही प्रतीक्षा आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा