• Sun. Jun 14th, 2026

    13 तासांचा प्रवास 6 तासांत, 2026ची डेडलाइन; तरीही ‘या’ चौपदरी महामार्गाचं काम रखडलं, कारण काय

    13 तासांचा प्रवास 6 तासांत, 2026ची डेडलाइन; तरीही ‘या’ चौपदरी महामार्गाचं काम रखडलं, कारण काय

    Indapur-Mangaon Bypass: मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. चार उड्डाणपूल आणि दोन बाह्यवळण रस्त्यांमुळे विलंब होत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळणांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: बहुप्रतीक्षित व त्यामुळेच बहुचर्चित असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या विस्तारीकरणाला चार उड्डाणपूल व दोन बाह्यवळण रस्त्यांमुळे विलंब झाला आहे. हेच सहा ‘स्पॉट’ विद्यमान वाहनचालकांसाठी काही प्रमाणात त्रासदायक ठरतात, हे रस्ते वाहतूक मंत्रालयाचे अधिकारीही खासगीत मान्य करतात. त्यापैकी चार उड्डाणपुलांची कामे चार ते सहा महिन्यांत पूर्ण होतील, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    मूळ मुंबई-गोवा महामार्गाचे आता चौपदरीकरण होत आहे. त्यातील पनवेल-कासू-इंदापूर या ८४ किमीच्या टप्प्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) होत आहे. ते काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र, महामार्गावरील खरा त्रास हा इंदापूरपासूनच सुरू होतो. इंदापूर ते झारप या जवळपास ४९० किमीच्या मार्गाचा विस्तार केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून थेट सुरू आहे.

    Maharashtra TimesThane-CSMT Flyover: ठाणे-सीएसएमटी प्रवास सुस्साट! शीव उड्डाणपुलाच्या समांतर दोन पदरी पूल उभारणार; कसा असेल नवा मार्ग?

    त्यातील सर्वात मोठा अडथळा हा इंदापूर येथील तीन किमीचे बाह्यवळण व माणगाव येथील सात किमीचे बाह्यवळण हे आहे. हे दोन्ही बाह्यवळण मूळ कामाच्या कंत्राटाचा भाग असतानाही ते झाले नाही. त्यामुळे ‘मॉर्थ’ने सहा महिन्यांपूर्वी नव्याने निविदा जाहीर केली. त्यानंतर आता ते काम सुरू झाले असून पूर्ण होण्यास किमान मार्च २०२७ उजाडणार आहे. यामुळेच इंदापूर व माणगाव, या भागातून हा महामार्ग ओलांडताना वाहतूककोंडीत वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याची स्थिती आहे.

    माणगावपासून पुढे महामार्ग तसा चांगला आहे. परशुराम घाटापासून पुढे झारपपर्यंतचा जवळपास तयार आहे. मात्र लांजा, निवळी, पाली व संगमेश्वर या ठिकाणी उड्डाणपुलांची कामे सुरू असल्याचा फटका वाहनचालकांना दोन वर्षांपासून बसत आहे. आता येत्या मार्च २०२६ पर्यंत हे उड्डाणपूल बांधून पूर्ण होतील व त्यावरून वाहतूक सुरू होईल, असे मंत्रालयाच्यामहामार्ग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

    अमित शाह धनंजय मुंडेंच्या पाठीशी, कोकाटे हीट विकेट, फडणवीस गेम करणार, संजय राऊतांची टीका

    बांधकाम टप्पे असे

    पनवेल-कासू – ४२.३, कासू-इंदापूर – ४२.३
    (वरील दोन्ही टप्पे एनएचएआयकडून बांधकाम)
    इंदापूर-वडपाले – २६.७५, वडपाले-भोगाव खुर्द – ३८.७६, भोगाव खुर्द-कशेडी – ८.९५, कशेडी-परशूराम – ४३.४३, परशूराम घाट-अरवली – ३४.४५, अरवली-कांटे – ३९.२४, कांटे-वाकेड – ४९.१५, वाकेड-तळगाव – ३३.२५, तळगाव-कळमठ – ३८.३८, कळमठ-झारप – ४३.९०
    (केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडून वरील सर्व टप्प्यांचे बांधकाम)

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम, मटा ऑनलाईनमध्ये कन्सल्टंट पदावर कार्यरत आहे. प्रामुख्याने क्राइम, सिव्हिक आणि पॉलिटिक्स या बातम्या कव्हर करते. याआधी सहा महिने महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमध्ये कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून काम केले आहे. त्या काळात कॉलेज इव्हेंट्स, शैक्षणिक उपक्रम आणि सोशल मीडियावरील ट्रेंड्सवर बातम्या केल्या. मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून BMM मध्ये पदवी घेतल्यानंतर सध्या के.सी. महाविद्यालयात MA in Communication and Journalism करत आहे. इंटरनॅशनल घडामोडी आणि पॉप कल्चर हे विषय विशेष आवडीचे असून इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत वाचन व लेखन करण्याची आवड आहे.… आणखी वाचा