• Wed. Jun 17th, 2026

    महायुतीत मतभेद नको; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका, PM मोदींची घेतली भेट

    ByMH LIVE NEWS

    Oct 26, 2025
    महायुतीत मतभेद नको; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका, PM मोदींची घेतली भेट
    मुंबई-
     केंद्रातील सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजपप्रणीत महायुती हे एकच विचारधारा आणि विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे एकत्र कुटुंब आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने विकासाचा आणि विचारधारेचा मार्ग दाखवला आहे. त्यामुळे निवडणुका असोत वा विकासकामे, दोघांनीही एकत्र राहूनच पुढे जायला हवे’, असे सांगतानाच ‘महायुतीमध्ये कोणतेही मतभेद होऊ नयेत. संबंधांमध्ये मिठाचा खडा पडू नये, याची काळजी सर्वांनी घ्यावी’, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.पंतप्रधानांच्या भेटीनंतर केंद्र आणि राज्य यांच्या अखत्यारितील विविध विषयांवर मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना शिंदे म्हणाले, ‘या निवडणुका तळागाळातील कार्यकर्त्यांसाठी असतात. कार्यकर्त्यांना लढायची इच्छा असते, परंतु अंतिम निर्णय हा वरिष्ठ नेतृत्व घेत असते. निर्णय झाल्यावर सर्व कार्यकर्त्यांनी शिस्त पाळावी’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
    बिहारमध्ये ‘एनडीए’च
    बिहार निवडणुकीबाबत बोलताना राष्ट्रीय लोकशाही आघाडी निश्चितच बहुमताने विजय मिळवेल असे शिंदे यांनी सांगितले. मुंबई, ठाणे आणि एमएमआरडीए क्षेत्रातील बिहारी बांधवांसोबत बैठका सुरू असून सर्वजण कामाला लागल्याचे त्यांनी नमूद केले. मोदी यांनी बिहारच्या विकासासाठी मोठा निधी दिल्याचेही शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.

    साताऱ्यातील दुर्घटना दुर्दैवी
    साताऱ्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले, ‘ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. एका आरोपीला अटक झाली असून इतरांना लवकरच अटक होईल. दोषींना कोणत्याही प्रकारे पाठीशी घातले जाणार नाही’,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
    स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मित्रपक्षांना स्वबळावर लढायला लावून भाजप शिंदेसेना व अजित पवारांच्या पक्षाचा काटा काढणार हे लक्षात आल्यानेच माझा पक्ष व मला वाचवा, अशी मनधरणी करण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केली. भाजप, शिंदेसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच प्रचंड वाद आहेत, तीनही पक्षात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याने हे सरकार पाच वर्ष कसे चालणार हा कुतुहलाचा प्रश्न आहे. आता शिंदेसेनेलाच गिळंकृत करण्याचा डाव भाजपाने आखला असून स्वतःला वाचवण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत गेले आहेत, पण भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ते शिंदेना कितपत दाद देतील हे पहावे लागेल, असे सपकाळ म्हणाले.
    पुण्यातील शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजप नेते व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातील वादावर भाष्य करताना, धंगेकरांना मी स्पष्ट संदेश दिला आहे, आवश्यक असल्यास मी स्वतः त्यांच्याशी बोलेन असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी महाराष्ट्रातील संतांचा उल्लेख करतात. कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराजांची मूर्ती पंतप्रधानांना भेट दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed