Maharashtra Weather Forecast : राज्यात पावसाने उघडीप घेतली असून या आठवडाभरातही पावसाची विश्रांती असेल. त्यानंतर मुंबई, पुणे, विदर्भातील भागात पावसाचा जोर वाढू शकणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांत उत्तर मुंबई तसेच डहाणू येथे पाऊस अधिक होता. शुक्रवार ते शनिवार, शनिवार ते रविवार या दोन दिवसांत सांताक्रूझ येथे अनुक्रमे ३४.२ आणि ३६.७, तर डहाणू येथे ३५.२ आणि ११०.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, येत्या आठवड्यात पालघर, ठाणे, मुंबई या तीनही जिल्ह्यांत शुक्रवारपर्यंत मध्यम सरींची शक्यता आहे. दक्षिण कोकणात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांतही मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडेल.
वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूबाबत महत्त्वाची बातमी, 6,788 कोटींची खर्चवाढ, काय होणार बदल? कुठून-कसा असणार मार्ग?
कोकण विभाग वगळता संपूर्ण मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत गुरुवार ११ सप्टेंबरपर्यंत पावसाची काहीशी उघडीप असू शकते. त्यानंतर मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण विदर्भ, खान्देश व नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यांत १२ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढू शकेल असा अंदाज निवृत्त हवामान विभाग अधिकारी माणिकराव खुळे यांनी वर्तवला. मुंबईसह संपूर्ण कोकण व मराठवाड्यातील १५ जिल्ह्यांत मात्र केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता जाणवते, असेही त्यांनी सांगितले.
Nashik car Rescue | नाशकात पावसाची जोरदार बॅटींग, कार बाहेर काढताना घाम फुटला
मुंबईतील कुलाबा केंद्रावर अजूनही सरासरीपेक्षा १५६ मिलीमीटर पाऊस कमी आहे. सांताक्रूझ येथे ऑगस्ट महिन्यातील पावसामुळे सध्याच्या सरासरीपेक्षा ५३४ मिलीमीटर पाऊस अधिक आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करता १ जूनपासून ८ सप्टेंबरपर्यंत सातारा, सोलापूर, हिंगोली, जालना, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत पावसाची तूट आहे.दुसरीकडे १४ सप्टेंबरनंतर परतीच्या पावसाला सुरुवात होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासकांनी दिली आहे. मराठवाड्यात येत्या ११ सप्टेंबरपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरुपातील पाऊस पडणार आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने १२ सप्टेंबरपासून पाऊस अधिक सक्रिय होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

