• Wed. Mar 11th, 2026

    Rain News: पुण्यासह 8 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, गणेश विसर्जन पावसात

    Rain News: पुण्यासह 8 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, गणेश विसर्जन पावसात

    Maharashtra Rain News: राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाकडून राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईतही जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: ऑगस्ट महिन्यात मुंबईत मुसळधार पाऊस होऊन चार दिवस मुंबई ठप्प पडली होती. त्यासोबत संपूर्ण राज्यात पावसाने गेल्या काही दिवसांत धुमाकूळ घातला होता. तर काही भागात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून संपूर्ण राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 3 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरदरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, विदर्भ, मराठवाडा येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

    हवामान विभागाने मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने मुंबईला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर, ठाणे, पालघर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसतील.

    सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे नवे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या पुढील तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि गोव्याच्या किनारपट्टीवर जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे.
    Maharashtra TimesDelhi Flood: यमुनामाई दिल्लीवर कोपली! सारं बुडालं, संसार उद्ध्वस्त, डोक्यावर सामान घेऊन घरं सोडण्याची वेळ
    बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावासासाठी अनुकूल हवामान तयार झालं आहे. कोकण आणि घाटमाध्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने कोकणला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यादरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

    आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

    पुण्यासह आठ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. बुधवारी (3 सप्टेंबर) राज्यातील पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती आहे. राज्यातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, चंद्रपूर, गोंदियामध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

    तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोलीत मध्यम ते मुसळधार स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर विकास उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत.गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहे. राष्ट्रीय, गुन्हेगारी, राजकीय, हटके स्टोरीज या विषयांचं लिखाण करण्यात हातखंडा आहे. घटनेचं विश्लेषणात्मक लिखाण करण्यात रस. गेल्या 9 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून यापूर्वी टीव्ही ९ मराठी, साममध्ये कामाचा अनुभव आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझमचं शिक्षण घेतलं आहे.… आणखी वाचा