• Tue. Sep 8th, 2026
शिक्षकांसाठी सरकारकडून मोठे गिफ्ट, वेतनवाढीसाठी हिरवा कंदिल; शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Govt approves Teachers Salary : राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)

म.टा.प्रतिनिधी, मुंबई : राज्यातील खासगी विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांना राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी अखेर चांगली बातमी दिली. राज्यातील खासगी विनाअनुदानित व अंशत: अनुदानित शाळा, तुकड्या आणि त्यामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वेतन अनुदानाच्या पुढील टप्प्यासाठी ९७०.४२ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली.

यासंदर्भातील निवेदन विधानसभेत सादर करताना दादा भुसे म्हणाले की, या निर्णयाच्या राज्यातील खासगी विनाअनुदानीत व अंशतः अनुदानित ६ हजार ७५ शाळा आणि ९ हजार ६३१ तुकड्यांमधील ४९ हजार ५६२ शिक्षकांना लाभ होणार आहे. याशिवाय २ हजार ७१४ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नव्याने २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. हे वेतन अनुदान १ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. तसेच अनुदानाच्या निकषानुसार अपात्र होणाऱ्या शाळा व तुकड्यांना स्वयं अर्थसहाय्यित अधिनियमांच्या तरतुदीनुसार विवक्षित शाळा म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Mumbai Teacher Protest | आझाद मैदानावर शिक्षकांचा आक्रोश, कवितेतून शिक्षकाची सरकारला साद

यासंदर्भात राज्यातील विविध शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनांनी काही दिवसांपूर्वी आझाद मैदानात आंदोलन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून विनाअनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील शिक्षकांचाही वेतनवाढीसाठी लढा सुरु होता. यावेळी शिक्षकांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. हजारो शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न दिवसेंदिवस गडद होत चालला होता. त्यासाठी अनेक आंदोलन उभारण्यात आली. आझाद मैदानावरही ठाण मांडून अनेक मार्गाने सरकारला साद घालण्यात आली. शिक्षकांच्या याच लढ्याला आता यश मिळाले आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड.आणखी वाचा