एनटीपीसी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याने नोकरी न मिळाल्याने स्वत:ला संपवलं. मृत शेतकऱ्याची ५ एकर जमीन प्रकल्पात गेली होती आणि वाढीव पैशांसाठी ते प्रयत्नशील होते. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी एनटीपीसीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
एनटीपीसी समोर मृतदेह ठेवला अन् ग्रामस्थांचा ठिय्या –
मिथुन राठोड यांनी शुक्रवारी सकाळी शिल्लक राहिलेल्या 2 एकर शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपविले.आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यावर फताटेवाडी गावातील लोकांनी एनटीपीसी विरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबधित एनटीपीसी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह एनटीपीसीच्या गेट समोर ठेवून आंदोलनाला सुरुवात केली आहे.शुक्रवारी दिवसभर मिथुन राठोड यांचा मृतदेह एनटीपीसीच्या गेटसमोर ठेवून ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत होते.
शेती जमीन एनटीपीसीत गेल्यावर मिथुन राठोड होते अस्वस्थ
मिथुन राठोड यांची शेती एनटीपीसीच्या प्रकल्पात अधिग्रहण करण्यात आली आहे.उरलेल्या शेतजमिनीतून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मिथुन राठोड हे एनटीपीसीत नोकरी मिळावी यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. सोलापूर एनटीपीसी प्रकल्पात गेलेल्या जमिनीची वाढीव रक्कम मिळत नाही त्यासाठी देखील मिथुन राठोड प्रयत्न करत होते.कोणत्याही कामात यश मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी सकाळी मिथुन राठोड यांनी शेतात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हे करण्यामागचे कारण लक्षात आल्याने नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर मृतदेह ठेवत आंदोलन सुरू केले आहे.

