• Sun. Mar 8th, 2026

    NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह

    NTPC प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यानं स्वत:ला संपवलं, नातेवाईकांनी कंपनीच्या गेटसमोर ठेवला मृतदेह

    एनटीपीसी प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्याने नोकरी न मिळाल्याने स्वत:ला संपवलं. मृत शेतकऱ्याची ५ एकर जमीन प्रकल्पात गेली होती आणि वाढीव पैशांसाठी ते प्रयत्नशील होते. या घटनेमुळे संतप्त गावकऱ्यांनी एनटीपीसीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    इरफान शेख, सोलापूर : नोकरी मिळाली नाही म्हणून एनटीपीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने शेतात आत्महत्या केल्याने सोलापुरात खळबळ उडाली आहे.दक्षिण सोलापूर येथील फटातेवाडी गावातील मिथुन राठोड (वय 45 रा.फटातेवाडी ) या शेतकऱ्याने आपल्या शेतात आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील एनटीपीसी प्रकल्पात मिथुन राठोड यांची जवळपास 5 एकर शेती गेली आहे.मिथुन राठोड हे विस्थापित झाल्यानंतर त्याचे वाढीव पैसे मिळावेत यासाठी शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू होते.केंद्र सरकारच्या एनटीपीसी प्रकल्पात नोकरीही मिळाली नाही यामुळे मिथुन राठोड त्रस्त होते अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.आर्थिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    एनटीपीसी समोर मृतदेह ठेवला अन् ग्रामस्थांचा ठिय्या –
    मिथुन राठोड यांनी शुक्रवारी सकाळी शिल्लक राहिलेल्या 2 एकर शेतात झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत आयुष्य संपविले.आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही बाब लक्षात आल्यावर फताटेवाडी गावातील लोकांनी एनटीपीसी विरोधात संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.शेतकऱ्याच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या संबधित एनटीपीसी अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी मृताच्या संतप्त नातेवाईकांनी मृतदेह एनटीपीसीच्या गेट समोर ठेवून आंदोलनाला सुरुवात केली आहे.शुक्रवारी दिवसभर मिथुन राठोड यांचा मृतदेह एनटीपीसीच्या गेटसमोर ठेवून ग्रामस्थ आक्रोश व्यक्त करत होते.

    शेती जमीन एनटीपीसीत गेल्यावर मिथुन राठोड होते अस्वस्थ
    मिथुन राठोड यांची शेती एनटीपीसीच्या प्रकल्पात अधिग्रहण करण्यात आली आहे.उरलेल्या शेतजमिनीतून म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे मिथुन राठोड हे एनटीपीसीत नोकरी मिळावी यासाठी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते. सोलापूर एनटीपीसी प्रकल्पात गेलेल्या जमिनीची वाढीव रक्कम मिळत नाही त्यासाठी देखील मिथुन राठोड प्रयत्न करत होते.कोणत्याही कामात यश मिळत नसल्याने अखेर शुक्रवारी सकाळी मिथुन राठोड यांनी शेतात गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या या कृत्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. हे करण्यामागचे कारण लक्षात आल्याने नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी कंपनीच्या गेटवर मृतदेह ठेवत आंदोलन सुरू केले आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा