• Mon. Mar 9th, 2026

    मराठी माणसांसाठी 30 टक्के…; विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला ठाकरे बंधुंकडे मोठी मागणी

    मराठी माणसांसाठी 30 टक्के…; विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला ठाकरे बंधुंकडे मोठी मागणी

    हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आवाज उठवल्यानंतर सरकारने जीआर रद्द केले, ज्यात मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची भूमिका निर्णायक ठरली. या पार्श्वभूमीवर, ठाकरे बंधू ५ जुलैला विजयी मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या पूर्वसंध्येला मराठी माणसासाठी एक महत्त्वाची मागणी या बंधुकडे केली आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    मुंबई: हिंदी सक्तीविरोधात राज्यातील विविध राजकीय पक्षांनी, संघटनांनी रान उठवल्यानंतर सरकारने त्यासंबंधीचे जीआर रद्द केले. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाची ठाम भूमिका आणि एकत्रित मोर्चाची दिलेली हाक ही निर्णायक होती. त्यामुळेच दोन्ही ठाकरे बंधूुंनी 5 जुलैला एकत्रित विजयी मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्रित येण्याची ही घटना ऐतिहासिक आहे. विजयी मेळाव्याच्या पूर्वसंध्येला ठाकरे बंधुंकडे मराठी माणसासाठी महत्त्वाची मागणी आम्ही गिरगावकर या संघटनेने बॅनर लावत केली आहे.

    आम्ही गिरगावकर संघटनेची मागणी
    आम्ही गिरगावकर संघटनेने बॅनरद्वारे केलेली मागणी, उद्धव साहेब व राजसाहेब आपणास सर्वात पहिली मागणी. जे जे बिल्डर आपल्याच मुंबईत मराठी लोकांना घर नाकारत आहेत. त्या ठिकाणी किमान 30 टक्के घर हे फक्त मराठी लोकांना ते पण वाजवी दरात मिळाली पाहिजे. असा कायदा झालाच पाहिजे. असा सज्जड दम 5 जुलैच्या भाषणात सरकारला द्याच.

    हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे, शिवसेना आणि विविध संघटनांकडून 5 जुलैलाच हा मोर्चा काढला जाणार होता मात्र रविवार 29 जूनलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदीसंबंधीचे दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे हिंदीसक्तीच्या लढ्याला यश आले. मोर्चा रद्द करण्यात आला मात्र या दिवशीच विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा ठाकरे बंधुनी केली.

    भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार?
    राज ठाकरेयांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत एकत्र येण्यासंबंधी महत्त्वाचे विधान केले होते. त्याला तात्काळ उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनीही ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली होती. दरम्यान हिंदी सक्तीचे जीआर आले आणि शिवसेना आणि मनसे यांनी त्याला जोरदार विरोध केला. तो मुद्दा दोन्ही ठाकरे बंधुंसाठी एकत्रित येण्यासाठी महत्त्वाचा ठरला. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात एकत्र आलेले राज ठाकरे उद्धव ठाकरे हे यापुढेही एकत्रित राजकारण करतील असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी एकत्रित येणे ही काळाची गरज असल्याचेही वक्तव्य सेना मनसेच्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कोणती भूमिका घेतात यावर महाराष्ट्राच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरणार आहे.

    नारायण परब

    लेखकाबद्दलनारायण परब महाराष्ट्र टाइम्स मध्ये कंटेन्ट रायटर म्हणून कार्यरत आहे. २०१७ पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले आहे. नवराष्ट्रसाठी कंटेन्ट रायटर म्हणून काम केले असून विविध इंस्टाग्राम पेजसाठी ही कंटेन्टची निर्मिती केली आहे. जनसंपर्क क्षेत्रातही फ्रिलान्सर म्हणून काम करण्याचा अनुभव. ऑल इंडिया रेडिओसाठीही काम केले आहे . क्रीडा, राजकारण, देश-विदेश, मनोरंजन, करिअर, ऑटो या कार्यक्षेत्रांमध्ये विशेष रस.
    साठये महाविद्यालयातील माध्यम विभागात २०१७ पासून व्याख्याता म्हणून कार्यरत.
    … आणखी वाचा