Monsoon Update: मान्सूनने 15 जूनची तारीखही चुकवली असून आता नागरिक केवळ आभाळाकडे नजर लावून बसले आहेत. उष्णता वाढत असून त्यात पूर्वमान्सून सरींच्या अभावामुळे उकाडा असह्य झाला आहे. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कसं असेल?
पुढील दोन दिवस महामुंबईमध्ये उष्ण आणि दमट वातावरण कायम राहणार असून संध्याकाळी गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. मात्र हा अंदाज खरा ठरला तरच उत्तर कोकणामध्ये नागरिकांना थोडा दिलासा मिळू शकेल.
मुंबईत मंगळवारी वातावरण कसं असेल?
मुंबईमध्ये सोमवारी सांताक्रूझ येथे ३५.२ तर कुलाबा येथे ३५ अंश सेल्सिअस कमाल तामपान नोंदले गेले. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.१ आणि ३.५ अंशांनी अधिक होते. किमान तापमान ३० अंशांहून खाली उतरले असले तरी किमान तापमानानेही अजून फारसा दिलासा दिलेला नाही. सांताक्रूझ येथे २९.५ आणि कुलाबा येथे २९.६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची सोमवारी नोंद झाली. हे तापमानही सरासरीपेक्षा अनुक्रमे ३.४ आणि ३.६ अंशांनी अधिक होते. दिवसभरात आर्द्रताही ६० ते ७० टक्क्यांदरम्यान असल्याने उकाड्यापासून मुंबईमध्ये दिलासा मिळण्याची अजिबातच संधी नव्हती. मुंबईमध्ये मंगळवारीही हेच वातावरण कायम राहील, अशी शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिवसभर उष्ण वातावरणानंतर संध्याकाळच्या सुमारास हलक्या पावसाची किंवा गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तवलेली आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात १६ आणि १७ जून या दोन्ही दिवशी हीच स्थिती असू शकेल. प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलेला असला तरी सॅटेलाइटमध्ये दिसणाऱ्या चित्रावरून आभाळात पावसाचे ढग नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे उष्णतेमुळे गडगडाट, विजा चमकतील का अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
पुणेकरांचा निम्मा जून महिना कोरडाच
प्रतिकूल वातावरणामुळे एकीकडे मान्सूनचा प्रवास गेल्या आठवडाभरापासून कोकणातच रेंगाळला असताना, पुण्यात यंदा पूर्वमोसमी पावसानेही निराशा केली आहे. मान्सूनच्या आगमनाचे संकेत घेऊन येणारा हा पाऊस यंदा जूनमध्ये बरसलाच नाही, त्यामुळे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) नोंदवहीत जूनच्या पहिल्या १५ दिवसांत शून्य पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी २०१४मध्ये पुण्यात हीच परिस्थिती नोंदविण्यात आली होती.
शहरात पुढील दोन दिवस तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. आकाश दुपारपर्यंत मुख्यतः निरभ्र राहून संध्याकाळनंतर अंशतः ढगाळ राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली नाही.
मंगळवारी विदर्भातील हवामान कसं असेल?
विदर्भात काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. गेल्या काही दिवसांमध्ये यवतमाळसारख्या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानाने उच्चांकी गाठली असून 42.4 अंश सेल्सिअसवर पोहोचलं होतं. मंगळवारी दिवसभर असचं वातावरण कायम राहणार असून पुढील काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून यवतमाळ, नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये या आठवड्यासाठी यलो अलर्ट दिला आहे. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाड्यात पावसाचा अंदाज
मराठवाड्यासाठीही हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा अलर्ट दिला होता. या भागात सध्या उष्ण आणि दमट वातावरण असून कमाल तापमानाचा पारा 35 ते 38 अंश सेल्सिअसदरम्यान आहे. येत्या काही दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद होण्याची शक्यता असली तरी मान्सूनची अजून प्रतीक्षाच आहे.
कोकणात मान्सून कुठे रखडला?
कोकणात मान्सून दाखल झाला की दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. मान्सूनमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 3 हजार 364 मिमी पाऊस पडतो. पण अशाच भागांत यंदा जून महिन्यात पाऊसचं झालेला नाही. हिंद महासागरात पाण्याच्या पुष्ठभागाचे तापमान वाढल्यामुळे मान्सूनचे वारे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत आहे. प्रादेशिक हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी येथेही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. राज्यात पावसाळ्याच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये ११ जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट आहे, २३ जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे तर २ जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढा पाऊस पडलेला आहे.
खानदेशात पाऊस कधी?
खानदेशातही नागरिक सध्या पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जळगाव आणि धुळे जिल्ह्यांमधेये हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसाठी यलो अलर्ट दिला असून दुपारच्या उन्हात घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस
मान्सून सध्या दक्षिण महाराष्ट्रात मुक्कामी आहे. त्यामुळे इतर भागांमध्ये पावसाचा तुटवडा जाणवत असून शेतकरी मान्सूनची वाट पाहत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सध्या मान्सूनपूर्व सरी अधूनमधून बरसत असल्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. मंगळवारी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
