• Wed. Mar 11th, 2026
    राज्यावर अवकाळीचे ढग, दोन जिल्ह्यात गारपिटीचा इशारा

    Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामान बदलत आहे. विदर्भात पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात उष्णता वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया, वर्धा येथे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता आहे. गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पाऊस येण्याची शक्यता आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)

    पुणे : राज्यात सतत हवामानात बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी ऊन वाढताना दिसतंय. मुळात म्हणजे मार्च महिन्यात होळीच्या अगोदर संपूर्ण राज्यात उष्णता वाढताना दिसली. मात्र, दुसरीकडे होळीनंतर उष्णता वाढण्याचे संकेत असताना तापमानात घट झाली आणि राज्यात अवकाळीचे सावट बघायला मिळाले. राज्यातील अनेक भागांमध्ये धुवाधार अवकाळी पाऊस झालाय. काही ठिकाणी गारपिट देखील झाली. या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अजूनही राज्यावर अवकाळीचे संकट कायम आहे.

    विदर्भावर अवकाळीचे मोठे संकट

    मागील चार ते पाच दिवस तापमान वाढताना दिसले. अनेक शहरांमध्ये तापमान हे ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. मात्र, आता परत एकदा राज्यावर अवकाळीचे ढग आल्याचे दिसतंय. राज्यात पावसाला पोषक असे वातावरण निर्माण झालंय. मागील काही दिवसांपासून विदर्भात पारा वाढताना दिसला. चंद्रपूरमध्ये सर्वाधिक राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. आता विदर्भकरांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळताना दिसतोय.

    चंद्रपूर आणि भंडारामध्ये गारपिटीचा इशारा

    हवामान खात्याच्या अंदाजानुसार, विदर्भातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे. चंद्रपूर आणि भंडारामध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील देण्यात आलाय. विदर्भात जरी गाटपिटीचा आणि पावसाचा इशारा देण्यात आला असला तरीही मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मात्र, उन्हाचे चटके अधिक तीव्र होणार आहेत. मराठवाड्याच्या काही भागांमध्ये तापमान सातत्याने वाढताना दिसत आहे.

    मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वाढणार उष्णता

    विदर्भात पुढील पाच दिवस पावसाचा अंदाजा वर्तवण्यात आला आहे. नागपूर, गोदिंया आणि वर्धामध्ये पुढील पाच दिवस पावसाचा अंदाजा आहे तर चंद्रपूरमध्ये आणि गडचिरोलीमध्ये पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आलाय. काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि वादळी वारे देखील सुटेल. यासोबतच राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असण्याचा अंदाजा देखील आहे. सातत्याने राज्यातील वातावरणात बदल होताना दिसतोय. कधी पाऊस तर कधी ऊन अशी स्थिती सध्या संपूर्ण राज्यात आहे.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed