• Fri. Apr 11th, 2025 12:04:21 PM

    Manikrao Kokate : ‘विचारपूर्वक वक्तव्य केलं पाहिजे’; माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

    Manikrao Kokate : ‘विचारपूर्वक वक्तव्य केलं पाहिजे’; माणिकराव कोकाटे यांच्या विधानावर अजित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

    Edited byचेतन पाटील | Authored by आदित्य भवार | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 5 Apr 2025, 9:01 pm

    Ajit Pawar on Manikrao Kokate Statement : माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवर केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    पुणे : राज्यभरात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं नुकसान झालं आहे. या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. यामुळे सरकारकडून लवकरात लवकर पंचनामा करुन मदत दिली जावी, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या दरम्यान संकट काळात राज्य सरकारने कर्जमाफी केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकते, अशी देखील भावना जनसामान्यांमध्ये आहे. महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. पण ते आश्वासन पूर्ण करण्यात आलेलं नाही. यामुळे सातत्याने कर्जमाफीची मागणी केली जात आहे. त्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना कर्जमाफीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर माणिकराव कोकाटे यांनी जे वक्तव्य केलं त्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे.

    कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर केलेल्या एका वक्तव्यामुळे ते नव्या वादात सापडले आहेत. माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्यावर विरोधकांकडून सडकून टीका केली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांनीदेखील माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावर आता त्यांच्या पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    अजित पवार काय म्हणाले?

    “माणिकराव कोकाटे काय बोलले माहिती नाही. ते नक्की काय बोलले त्यांना विचारावे लागेल. सरकारमध्ये काम करत असतानाना विचारपूर्वक वक्तव्य केलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. “हर्षवर्धन सपकाळ निवडणुकीत एकदा निवडून आले होते. दुसऱ्यांदा उभे राहिले त्यावेळी चौथ्या क्रमांकावर राहिले. ते काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यापासून पक्षात किती चैतन्य आलं ते आपण पाहतो. त्यामुळे त्यांनी केलेल्या टीकेवर मी बोलणार नाही”, असं प्रत्युत्तर अजित पवार यांनी दिलं.

    यावेळी त्यांनी तनिषा भिसे मृत्यू प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेमुळे असंतोष पहायला मिळाला. अत्यंत चुकीचं घडलं. सरकारतर्फे चौकशी समिती नेमण्यात आली आहे. अजूनपर्यंत अहवाल आला नाही. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होईल”, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

    “पीएमआरडीए विकास आराखड्याबाबत मोठ्या प्रमाणानुसार तक्रारी आल्या होत्या. बांधकाम व्यावसायिकांचा हस्तक्षेप तसेच आरक्षणाबाबत अनेक गोष्टी कानावर आल्या होत्या. मुख्यमंत्री PMRDA चे अध्यक्ष आहेत. त्यांनी मला विचारले काय करायचे? मी म्हणालो चुकीचे घडत असेल तर चूक सुधारायला हवी. त्यानंतर त्यांनी प्रारूप विकास आराखडा रद्द केला”, अशीदेखील प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
    Dhananjay Munde : मोठी बातमी! धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळली, कोर्टाचा निर्णय करुणा शर्मा यांच्या बाजूने

    माणिकराव कोकाटे यांचं वक्तव्य काय?

    “कर्जमाफी मिळाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशांचं तुम्ही काय करता? शेतीमध्ये गुंतवणूक आहे का एक रुपयाची तरी? सरकार आता तुम्हाला शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार. शेतकरी ५ ते १० वर्ष वाट पाहतात, तोपर्यंत कर्ज भरतच नाही. सरकार सिंचनासाठी, पाईपलाइनसाठी, पिकांसाठी, शेततळ्याला पैसे देणार आहे. भांडवली गुंतवणूक सरकार करतं, शेतकरी करतो का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे हवेत, ह्याचे-त्याचे पैसे हवेत, मग साखरपुडे करा, लग्न करा”, असं वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलं आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed