Weather Forecast : लातूर जिल्ह्यात आज अचानक संध्याकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. अवकाळी पावसाने ज्वारी, हरभरा आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
लातूर जिल्ह्यातील रायगव्हाणमध्ये संध्याकाळच्या वेळेस जोरदार गारपीटसह पाऊस पडला आहे. जोरदार होणाऱ्या गारपीटमुळे जनजीवन विस्कळीत झालं. या गारपीटचा जनावरांना मोठा फटका बसला आहे. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका जानवत होता. विशेष म्हणजे आज दिवसभरही प्रचंड ऊन होतं. पण अचानक संध्याकाळी वातावरणात मोठा बदल झाला. लातूर जिल्ह्यातील अनेक गावात विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला. या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
पुढचे काही तास महत्त्वाचे
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यासाठी पुढचे 3 ते 4 तास जास्त महत्त्वाचे आहेत. कारण या ठिकाणी पुढच्या काही तासात नांदेड आणि लातूरमध्ये हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. तसेच काही भागात ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाटासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या, असं आवाहन हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी केलं आहे.

