Maharashtra Weather Forecast : चक्रीय वाऱ्यांमुळे अनेक शहरांमध्ये तापमानाची पातळी वाढली आहे. मुंबई, अलिबाग आणि रत्नागिरीत सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले गेले आहे. राज्यातील अन्य भागांतही कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक होते, तरी काही ठिकाणी तापमान सरासरीपेक्षा कमी राहिले.
मुंबईमध्ये सांताक्रूझ येथील कमाल तापमान ३७.४ अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली. हे तापमान ४.५ अंशांनी सरासरीपेक्षा अधिक होते. अलिबाग येथे बुधवारी सरासरीपेक्षा ५.४ अंशांनी अधिक तापमान नोंदले गेले. अलिबाग येथे ३५.९ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. डहाणू येथेही सरासरीपेक्षा ५.२ आणि रत्नागिरी येथे ५.७ अंश सेल्सिअस कमाल तापमान अधिक होते. कोकण विभागात मुंबईतील कुलाबा वगळता इतर सर्व ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा मोठ्या फरकाने अधिक होते. कुलाबा येथे ३३.४ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
Sambhajinagar : ऊन वाढले; बाष्पीभवनही वाढले, भविष्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता गोव्यात पणजी केंद्रावरही ३६.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. कुलाबा येथे आर्द्रता ५४ टक्के होती तर सांताक्रूझ येथे आर्द्रता २८ टक्के होती. मध्य महाराष्ट्रात पुणे, लोहगाव, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर येथे कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक होते. सोलापूर येथे बुधवारी राज्यातील सर्वाधिक म्हणजे ३८.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रातही सर्वदूर कमाल तापमान ३५ पार असले तरी सरासरी तापमानापेक्षा बुधवारचे कमाल तापमान मोठ्या फरकाने चढे नव्हते.
मराठवाड्यातही धाराशीव, परभणी, बीड येथे कमाल तापमान ३५ अंशांहून अधिक नोंदले गेले. विदर्भात वाशिमवगळता अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले गेले. वाशिम येथे सरासरीपेक्षा ३.१ अंशांनी कमाल तापमान अधिक नोंदले गेले. अकोला,चंद्रपूर, वाशिम या तीन केंद्रांवर कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांहून अधिक होता. पुढील दोन दिवस विदर्भामध्ये तापमानात फार मोठा बदल होण्याची शक्यता नाही. मात्र त्यानंतर कमाल तापमानात ३ ते ५ अंशांची वाढ होऊ शकते.

