Namdev Shastri On Dhananjay Munde Resignation : धनंजय मुंडे यांनी नैतिकतेचे कारण सांगून अखेर आपला राजीनामा काल(४ फेब्रुवारी) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला. यावर आता भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणी पहिल्या दिवशी आपल्याला पूर्वकल्पना नसल्याचे महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितले.
महंत नामदेव शास्त्री यांनी माध्यमांसमोर संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केलेले विधान तुटपुंज्या माहितीच्या आधारे केल्याचे म्हटले. परंतु देशमुख कुटुंबियांशी झालेल्या भेटीनंतर आपल्याला संपूर्ण घटनेची जाणीव झाल्याचे सांगितले. त्यामुळे लोकांनी गैरसमज करू नये असे आवाहन करत, न्यायालयाने देखील हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालून देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
सोमवारी(३ फेब्रुवारी) बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची जी निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्याचे फोटो प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्याबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती वाल्मिक कराड याचा या घटनेशी संबंध असल्याने मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या करिता विरोधकांनी रान पेटवले. त्यामुळे अखेर त्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला.
भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी एक पत्रकार परिषद घेत संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना पाठिंबा जाहीर केला होता. याप्रकरणात भगवान गड खंबीरपणे धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभा आहे, असे वक्तव्य करुन नामदेव शास्त्री महाराज यांनी भाजप आणि अजित पवार यांना इशारा दिल्याची चर्चा होती. धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला धक्का लागल्यास वंजारी समाजाची नाराजी ओढावून घ्याल, असा अप्रत्यक्ष इशारा भगवान गडाने दिल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर नामदेव शास्त्री यांची काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिल्या वेळी केलेले वक्तव्य तुटपुंज्या माहितीवर केले असल्याचे म्हणत, भगवान गड देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे आता ते म्हणत आहेत.
